मे महिन्याचे रणरणते ऊन त्यात जिवलग मित्राचं लग्न त्यामुळे जाणं भाग होतं म्हणून मी आणि माझा मित्र श्रीधर दोघे जण प्रवासाला लागलो. शनिवारी पहाटे ५ वाजताच आपली 56 नंबर काढली आणि गावच्या दिशेने रवाना झालो. सूर्योदयाच्या आत बऱ्यापैकी अंतर कापायचे असं उद्धिष्ट डोक्यात होत व त्यादृष्टीने वाटचाल चालू होती. बारवी डॅममार्गे गेल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग खुणावत होता थोडं पुढे गेल्यावर वाटेत धुक्यात लपलेल्या नाणेघाटाच दर्शन झालं.
धुक्यात लपलेला नाणेघाट
थोडावेळ तिकडे वेळ घालवून पुढे गेलो. माळशेज घाटात पोहचे पर्यंत साडेसहाच वाजले होते त्यामुळे बऱ्यापैकी गारवा होता सगळीकडे धुकं होतं. त्या गारव्याची मजा घेतली कारण इतक्या गर्मीच्या हवामानात वाजणारी थंडी अनपेक्षित होती त्यामुळे गाडी एका बाजूला लावून १० मिनिट विश्रांती घेतली पण उन्हाचा तडाखा लागायच्या आत निघायचा निर्णय घेतला
मित्राचं लग्न होतं म्हणून इतका प्रवास पण फक्त जाऊन लग्न लावून येणं स्वतःलाच नामंजूर. त्यामुळे तिथे जवळच असलेल्या मित्राच्या घरी राहून आजूबाजूची ठिकाणे पाहायचा निर्णय घेतला. उन्हाचा तडाखा असल्याने जे काही करायचे ते दुपारनंतर आणि सकाळी लवकर. पण ह्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा गावातील सौंदर्य कधीच कात टाकत नाही पुढील दृश्यं त्याचाच एक नमुना.
गावचा साज
पेमगिरी हे गाव जरी छोटे असले तरी तिथली आकर्षण खरंच खूप दर्शनीय आहेत. त्यातील पाहिलं म्हणजे किल्ले "पेमगिरी उर्फ शहागड". दुसरं आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष, तिसरं अहिल्याबाई होळकरांच्या काळातील म्हणजेच १६४२ च्या काळातील बारव म्हणजेच "विहीर" आणि शेवटचं म्हणजे स्वतंत्र पूर्व काळातील हनुमान मंदिर.
किल्ले पेमगिरी
उन्हापासून वाचण्यासाठी म्हणून पाहिल्याच दिवशी संध्याकाळी पेमगिरी किल्यावर प्रस्थान केले. आता पेमगिरी किल्ल्यावर वरपर्यंत जाण्यास पक्का डांबरी रस्ता झाल्याने गाडी थेट गडावर जाते. त्यामुळे आम्ही थेट गाडीने वरपर्यंत गेलो. गाडी असल्याने गडावर जास्त वेळ मिळाला. पेमगिरी उर्फ शहागड छोटेखानी असला तरी ह्याचा इतिहास अतिशय रोमांचक आहे. इ स १६३२ चा दिल्लीचा मुघल सम्राट शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा ह्या दोन्ही सत्तांनी मिळून निजामशाही संपवली. त्यावेळी मूर्तजा ह्या अल्पवयीन असलेला निजामशाहीच्या वरसदाराला गादीवर बसवून मराठी सुभेदार शहाजी राजे भोसले ह्यांनी शहागडावरून ३ वर्ष राज्यकारभार चालवला. आत्ता ह्या गडावर यादवकालीन पाण्याची टाकी आणि पेमादेवीचे मंदिर अस्तित्वात आहे.
पेमादेवीचे देऊळ
बाळंतिणीचे टाके
पुरातत्व खात्याने जसं वरपर्यंत पोहोचण्यास रस्ता केला आहे तसेच येणाऱ्या पर्यटकांना बसण्याची योग्य ती व्यवस्था केली आहे. असेही एव्हाना साडेसहा वाजलेच होते म्हणून सूर्यास्त बघूनच खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
पर्यटकांसाठी केलेली व्यवस्था
पेमगिरीवरील सूर्यास्त
360 DEGREE VIEW
सूर्यास्ताचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. पण पुन्हा एकदा दुसऱ्यादिवशी सकाळी येण्याच्या विचाराने खाली उतरलो.
खाली उतरल्यावर दुसरं आकर्षण नजरेस पडलं ते म्हणजे १९४२ सालचे "हनुमान मंदिर". हे मंदिर पूर्ण सागाच्या लाकडाचे असुन मागील वर्षी ह्या मंदिरास रंगाचा मुलामा देऊन ह्या मंदिरास नावसंजीवनी प्राप्त झाली आहे.अनायसे शनिवार असल्यामुळे अनपेक्षितपणे मिळालेले हे हनुमानाचे दर्शन संस्मरणीय ठरले. गावातच आमच्या ओळखीचे "जगदीशदादा डुबे" राहतात त्यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम झाला व त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं काही दिवसात ह्या मंदिरात 22 फूट उंच गदेची प्रतिष्ठापना होणार आहे. ती बघायला परत एकदा पेमगिरी गावात भेट द्यायला मी नक्की जाईन आणि आपणसुद्धा कधी पेमगिरी गावात गेलात तर न विसरता ह्या मंदिरास भेट द्यावी. मंदिरात पेमगिरी गावच्या आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो आहेत ते पाहिल्यावर कळलं की इकडे एक १६व्या शतकातील बारव (विहीर) आहे. तेव्हा ठरवलं उद्या सकाळी लवकर उठून प्रथम गडावर जायचं आणि नंतर ही बारव बघायची.
१९४२ सालचे हनुमान मंदिर
जय हनुमान
एव्हाना साडेसात वाजल्यामुळे आम्ही थेट घरच्या वाटेला लागलो संध्याकाळ असल्याने हवेत गारवा होता. रात्री आम्ही चार मित्र मी , श्रीधर, आमचा मित्र "राहुल बोरसे उर्फ गणू" आणि आमच्या ग्रुप चे जेष्ठ प्रवचनकर्ते "विजय राऊत" ह्यांच्या साथीने आमच्या गप्पांचा फड रंगला. विजय बाबांचे मोलाचे सल्ले ऐकून रात्री आम्ही उशिरा झोपलो व दुसऱ्यादिवशी सकाळी साडेपाचच्या सुमारास उठून पुन्हा गडाच्या दिशेने निघालो सूर्योदयाची वेळ होती.
गडावरील सूर्योदय
गाडी थेट गडावर नेऊन सूर्योदय कॅमेरात टिपला व थोड्या वेळ त्या शांततेचा आनंद घेतला आणि आमच्या पूर्वनियोजित ठिकाणाकडे वाटचाल सुरू केली. पूढील ठिकाण हे अतिशय लोकप्रिय होत ते म्हणजे "आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष".
अब तक ५६ . . .
ह्या वटवृक्षाला पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात. सुमारे अडीच ते तीन एकरात पसरलेला हा वटवृक्ष एका नजरेत भरणे तसे कठीणच. पण पेमगिरी गावापासून केवळ अडीच किलोमीटर अंतरावर असलेला निसर्गाचा अविष्कार असलेला हा महाकाय वटवृक्ष सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.
महाकाय वटवृक्ष
वडाच्या पायथ्याशी गावकऱ्यांनी एक मूर्ती बसवलेली आहे. त्यामागे एक कथा आहे त्यामुर्ती मध्ये एक राजा त्याची बहीण एक वाघ व एक कुत्रा आहे. गावकऱ्यांच्या तोंडून ऐकलं तर असं कळत की "एकदा एक बाबा होता तो शेळ्या चरायला न्यायचा तेव्हा त्याची शेळी वाघाने पकडली म्हणून त्या बाबाने त्या वाघाला लालकरलं त्यामुळे त्याच्यावर वाघाने हल्ला केला तेव्हा त्या बाबाने आपल्या हातातली कुऱ्हाड वाघाच्या डोक्यात घातली अशी त्यांची झटापट गडावरून खालपर्यंत येऊन थांबली तेव्हा सोबत असलेला कुत्रा त्या वाघाचे लचके तोडत होता संध्याकाळची वेळ असल्याने त्या बाबाची बहीण त्याला शोधत निघाली असता रक्ताच्या डागावरून ती वडापर्यंत येऊन पोचली व तिला दिसलं की भाऊ मृत्यमुखी पडला आहे तिला दुःख अनावर झालं आणि तिने हातातला पाण्याचा गढवा डोक्यात मारून स्वतः स्वतः प्राण सोडला" अशी कहाणी ह्या मूर्तीची. म्हणून आजही ह्या वडाखाली असलेल्या ह्या मूर्तीची लोक मनोभावे पूजा करतात.
वटवृक्षाजवळील मूर्ती
पुढील ऐतिहासिक आकर्षण म्हणजे १६४२ सालची अहिल्याबाई होळकरांच्या काळातील ऐतिहासिक बारव. आजच्या काळात ही विहीर खूप दुर्लक्षित झाली असली तरी आजही त्याचं अस्तित्व टिकून आहे. आज सुमारे साडेतीनशे वर्षानंतरही ह्या विहिरींची अजिबात पडझड झालेली नाही काही प्रमाणात अस्वच्छतेचं साम्राज्य आहे व कदाचित उन्हाळ्यामुळे पाणी आटलेलं असावं. पण खरंच पाहण्याजोगी हि विहीर आहे.
सन १६४२ सालची बारव
त्या विहिरीचे काही फोटो काढून आम्ही आता घरच्या दिशेला निघालो. एव्हाना ९ वाजले होते त्यामुळे सूर्यदेव आपल्या कामाला लागले होते. घरी जाऊन फ्रेश झालो माझ्या मित्राचा भाऊ "गणेशदादा गोपाळे" ह्याने आम्हाला नाश्त्यासाठी आमंत्रित केलं होतं. तिथे नाश्ता केला आणि त्यांच्या शेतात एक चक्कर मारली थोड्या गप्पा टप्पा झाल्या ताज्या टोमॅटोचा आस्वाद घेतला. शेतातील काही फोटो काढले व निघायच्या तयारीला लागलो .
इतके ताजे खायची सवय नाही !!!
कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही???
सुमारे ४ च्या सुमारास उन्हाचा पारा कमी झाल्यावर आम्ही आपली बाईक घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झालो मध्येच माळशेज घाटात उत्तम सूर्यास्ताचे दृश्य टिपलं. सुमारे ९ च्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो.
माळशेजवरून टिपलेले सूर्यास्ताचे दृश्य
ब्लॉग वाचून कसं वाटलं ते कळवावे व कधीही पेमगिरी ह्या गावात गेल्यास वरील सर्व वास्तूंना नक्की भेट द्यावी, नवीन काहीतरी पहिल्याचे समाधान मिळेल एवढं नक्की.
No comments:
Post a Comment