Saturday, 6 July 2019

माणिकगड : सह्याद्रीचं माणिकरत्न (MANIKGAD FORT)

               पावसाळ्यातील पहिल्या ट्रेकच्या नंतर पावसाने जी दडी मारली ती परत येण्याची चिन्ह दिवसेंदिवस काही दिसत नव्हती शेवटी वैतागून गुरुवारी कुठेतरी दूरचा दौरा करण्याचा विचार करत असतानाच शुक्रवारी दुपारपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. तेव्हा पुन्हा एकदा उत्साह जागृत झाला आणि परत आपल्या सह्याद्रीच्या दिशेने पावलं वळवली. कुठे जायचं हा प्रश्न असला तरी इर्शाळगडच्या वेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला माणिकगडचं खुळ डोक्यात घातलं होतं म्हणून जास्त विचार न करता एकमताने ठरलं कि जायचं कुठे तर "माणिकगड".
  माणिकगड
         माणिकगडला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे अंबरनाथहून ८ वाजताची लोकल पकडून ९ वाजता कर्जतला जाऊन आपली ठरलेली गाडी पकडली आणि माणिकगडच्या पायथ्याचे गाव गाठलं ते म्हणजे "वडगांव". कर्जत ते वडगाव हे अंतर सुमारे १८ किमी आहे.  वडगाव वरून माणिकगड जरी समोर दिसत असला तरी तिथपर्यंत पोहोचण्याची वाट अजिबात साधी नाही.  गडावर चढण्यास सुमारे ७ किलोमीटरची लांबसडक पायवाट व ती पण विंचू काट्यासारखी.
गावातून दिसणारा माणिकगड 
माणिकगडाकडे वाटचाल करणारे मावळे.
            वडगाव मध्ये पोहोचल्यावर गावकऱ्यांशी चौकशी करून प्रथम वाटेचा अंदाज घेतला व प्रवासाला सुरुवात केली एव्हाना साडेदहा वाजले होते.  प्रथमदर्शनी पाहिल्यास द्विधा मनस्थिती होत होती की गाईड घ्यावा की नाही?? पण नंतर विचार आला की नकोच. तसं आत्ताची परिस्थिती पहिली तर गडावर जाण्यास गाईडची गरज नाही. गावातल्या शेतातून चालल्यावर पाहिले एक चढाव पार केल्यावर  मागे वळून पाहिलं तेव्हा वडगावचा पूर्ण नजारा एक नजरेत भरला.
वडगाव
            पुढे काही गावकरी गुरं चरायला घेऊन आले होते.  त्यांच्याकडूनही वाटेची खातरजमा केली एव्हाना चालून अर्धा तास झाला होता इतका वेळ ढगात लपलेल्या माणिकगडने प्रथम आम्हाला दर्शन दिले त्यासोबत एक फोटो काढून पुढे निघालो नुकताच पाऊस पडल्याने जागोजागी मशरूम दिसत होते
 गुराखी 

            पावसाची ये जा चालू होती पण समोरच्या गडाचा अंदाज लक्षात घेता एक गोष्ट स्पष्ट झाली होती की वर पर्यंतची चाल काही साधी नाहीये त्यामुळे न थांबता आम्ही आमची चाल सुरूच ठेवले थोडं वर गेल्यावर एक भलंमोठ पठार लागलं ते म्हणचे "दिवाणमाची"
 दिवाणमाची 
              दिवाणमाचीवर पोहोचल्यावर समोर दोन रस्ते दिसले म्हणून तिथेच थांबून व्यवस्थित खातरजमा करून उजव्या हाताचा रस्ता पकडून गडाकडे वाटचाल सुरू केली. गडावर जाण्यासाठी जागोजागी फलक व संपूर्ण वाटेवर झाडावर लाल रिबीन बांधून ठेवल्या आहेत जेणेकरून आपल्याला आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री होते. आधी म्हणल्याप्रमाणे विचुकाट्यासारखीची हीच ती चाल, जी उजवीकडे जाऊन पुढे डाव्याबाजूने आपल्याला गडावर घेऊन जाते.


गडावर जाण्यासाठी असलेले दिशादर्शक व फलक
            उजव्याबाजूची ही वाट म्हणजे पूर्ण जंगलवाट. नुकताच पाऊस सुरू झाल्याने बरेचसे प्राणी कीटक बाहेर पडलेले दिसत होते.  जागोजागी पाणी आपली वाट काढत त्याच रूपांतर धबधब्यात करण्याच्या तयारीत होते आजूबाजूचा हिरवागार गालिचा आणि शांतता हा आजच्या काळात खऱ्या अर्थाने दुर्मिळ योगायोग आहे. निसर्गाच्या सानिध्यातील हा आनंद लुटत व वाटेतील निदर्शनास येत असलेल्या ननैसर्गिक किमयेचे काही फोटो काढत आम्ही पुढे जात होतो. तोच वरील धुकं बाजूला होऊन माणिकगड चं खरं रूप नजरेस पडलं.
निसर्गाची किमया :














माणिकगडाचं खरं रूप
            काही काळ इथे थांबून पुढे निघालो. पुढे एक हनुमानाचं छोटेखानी मंदिर दिसलं. त्यातली मूर्ती पण काही दुर्मिळच होती. त्या हनुमानाच्या पायाखाली कोणाची तरी प्रतिमा होती. ते सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं. हे मंदिर म्हणजे गडाच्या वाटेवरील मध्यवर्ती ठिकाण.  आतापर्यंत पठारावरून चालत आलेला प्रवास आता वरच्या दिशेने सुरु होणार होता व आताची वाट म्हणजे घनदाट जंगलातली वाट.
 
वाटेवरील हनुमान मंदिर
               इथून पुढे १० मिनिटं चालत गेल्यास डाव्याबाजूने जाणारी वाट ही थेट गडावर घेऊन जाते ही वाट म्हणजे घनदाट जंगल आणि पाऊस असल्याने कोसळणाऱ्या धबधब्यांची वाट. ह्या सगळ्याची मजा घेत आम्ही आता माणिकपासून फक्त २० मिनिटं दूर होतो.  एक चढण पार केली आणि थेट धुक्याच्या साहाय्याने आम्ही गडावर प्रवेश केला



गडावर पोहोचण्यासाठी जंगलवाट          
               गडावर प्रवेश करताच प्रथम एक पाण्याचं टाकं आणि तटबंदी नजरेस पडली.  तेव्हा खात्री पटली की आपण गडावर प्रवेश केला. गडावर एकूण पाण्याची ४ टाकं आहेत. ह्या तटबंदीला डाव्या हाताला ठेवून उजव्या हाताने वर केल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो.

 गडाची तटबंदी
             गडावर प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधून आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात. कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात. येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरुवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो.
चुन्याचा घाणा
प्रवेशद्वार
धान्याचं कोठार व दुसरं प्रवेशद्वार
 गडावरील पाण्याचं टाकं 
जिंकलस गड्या!!!
              उन्हाळ्यात आल्यास किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो. गडाच्या मागच्या बाजूस जाऊन गावचा परिसर न्याहाळला धुक्यांनी भरलेल्या ह्या दरीत पाऊस वर आणि ढग ह्या तिघांचा खेळ बघण्यात वेगळीच मजा येत होती

स्वर्गसुख 
            पावसाचा अंदाज घेऊन आता आम्ही जेवायला सुरुवात केली. पण शेवटी पाऊस आलाच. मग काय पावसातच जेवलो व पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. एव्हाना अडीच वाजले होते. उतरताना वेळेचा अंदाज घेतला व चालीचा वेग वाढवला तरीही खाली पोहोचण्यास साडेपाच वाजले.
         दिसायला छोटेखानी वाटणारा हा गड पण त्यास पोहोचण्यासाठी असलेली वाट ही दमछाक करणारी आहे. म्हणून माणिकगड करावयाचा झाल्यास तो पावसाळ्यातच करावा. येताना गाडीच्या खिडकीतून आम्हाला पुन्हा माणिकगडचं झालं तेव्हा आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो ह्या गोष्टीवर आम्हालाच विश्वास बसत नव्हता. अखेर सगळ्या आठवणींची पुंजी घेऊन कर्जत स्टेशनवरून परतीची ट्रेन पकडून घर गाठलं.
पुन्हा भेटुत.... लवकरचं .

4 comments: