Saturday, 6 July 2019

माणिकगड : सह्याद्रीचं माणिकरत्न (MANIKGAD FORT)

               पावसाळ्यातील पहिल्या ट्रेकच्या नंतर पावसाने जी दडी मारली ती परत येण्याची चिन्ह दिवसेंदिवस काही दिसत नव्हती शेवटी वैतागून गुरुवारी कुठेतरी दूरचा दौरा करण्याचा विचार करत असतानाच शुक्रवारी दुपारपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. तेव्हा पुन्हा एकदा उत्साह जागृत झाला आणि परत आपल्या सह्याद्रीच्या दिशेने पावलं वळवली. कुठे जायचं हा प्रश्न असला तरी इर्शाळगडच्या वेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला माणिकगडचं खुळ डोक्यात घातलं होतं म्हणून जास्त विचार न करता एकमताने ठरलं कि जायचं कुठे तर "माणिकगड".
  माणिकगड
         माणिकगडला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे अंबरनाथहून ८ वाजताची लोकल पकडून ९ वाजता कर्जतला जाऊन आपली ठरलेली गाडी पकडली आणि माणिकगडच्या पायथ्याचे गाव गाठलं ते म्हणजे "वडगांव". कर्जत ते वडगाव हे अंतर सुमारे १८ किमी आहे.  वडगाव वरून माणिकगड जरी समोर दिसत असला तरी तिथपर्यंत पोहोचण्याची वाट अजिबात साधी नाही.  गडावर चढण्यास सुमारे ७ किलोमीटरची लांबसडक पायवाट व ती पण विंचू काट्यासारखी.
गावातून दिसणारा माणिकगड 
माणिकगडाकडे वाटचाल करणारे मावळे.
            वडगाव मध्ये पोहोचल्यावर गावकऱ्यांशी चौकशी करून प्रथम वाटेचा अंदाज घेतला व प्रवासाला सुरुवात केली एव्हाना साडेदहा वाजले होते.  प्रथमदर्शनी पाहिल्यास द्विधा मनस्थिती होत होती की गाईड घ्यावा की नाही?? पण नंतर विचार आला की नकोच. तसं आत्ताची परिस्थिती पहिली तर गडावर जाण्यास गाईडची गरज नाही. गावातल्या शेतातून चालल्यावर पाहिले एक चढाव पार केल्यावर  मागे वळून पाहिलं तेव्हा वडगावचा पूर्ण नजारा एक नजरेत भरला.
वडगाव
            पुढे काही गावकरी गुरं चरायला घेऊन आले होते.  त्यांच्याकडूनही वाटेची खातरजमा केली एव्हाना चालून अर्धा तास झाला होता इतका वेळ ढगात लपलेल्या माणिकगडने प्रथम आम्हाला दर्शन दिले त्यासोबत एक फोटो काढून पुढे निघालो नुकताच पाऊस पडल्याने जागोजागी मशरूम दिसत होते
 गुराखी 

            पावसाची ये जा चालू होती पण समोरच्या गडाचा अंदाज लक्षात घेता एक गोष्ट स्पष्ट झाली होती की वर पर्यंतची चाल काही साधी नाहीये त्यामुळे न थांबता आम्ही आमची चाल सुरूच ठेवले थोडं वर गेल्यावर एक भलंमोठ पठार लागलं ते म्हणचे "दिवाणमाची"
 दिवाणमाची 
              दिवाणमाचीवर पोहोचल्यावर समोर दोन रस्ते दिसले म्हणून तिथेच थांबून व्यवस्थित खातरजमा करून उजव्या हाताचा रस्ता पकडून गडाकडे वाटचाल सुरू केली. गडावर जाण्यासाठी जागोजागी फलक व संपूर्ण वाटेवर झाडावर लाल रिबीन बांधून ठेवल्या आहेत जेणेकरून आपल्याला आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री होते. आधी म्हणल्याप्रमाणे विचुकाट्यासारखीची हीच ती चाल, जी उजवीकडे जाऊन पुढे डाव्याबाजूने आपल्याला गडावर घेऊन जाते.


गडावर जाण्यासाठी असलेले दिशादर्शक व फलक
            उजव्याबाजूची ही वाट म्हणजे पूर्ण जंगलवाट. नुकताच पाऊस सुरू झाल्याने बरेचसे प्राणी कीटक बाहेर पडलेले दिसत होते.  जागोजागी पाणी आपली वाट काढत त्याच रूपांतर धबधब्यात करण्याच्या तयारीत होते आजूबाजूचा हिरवागार गालिचा आणि शांतता हा आजच्या काळात खऱ्या अर्थाने दुर्मिळ योगायोग आहे. निसर्गाच्या सानिध्यातील हा आनंद लुटत व वाटेतील निदर्शनास येत असलेल्या ननैसर्गिक किमयेचे काही फोटो काढत आम्ही पुढे जात होतो. तोच वरील धुकं बाजूला होऊन माणिकगड चं खरं रूप नजरेस पडलं.
निसर्गाची किमया :














माणिकगडाचं खरं रूप
            काही काळ इथे थांबून पुढे निघालो. पुढे एक हनुमानाचं छोटेखानी मंदिर दिसलं. त्यातली मूर्ती पण काही दुर्मिळच होती. त्या हनुमानाच्या पायाखाली कोणाची तरी प्रतिमा होती. ते सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं. हे मंदिर म्हणजे गडाच्या वाटेवरील मध्यवर्ती ठिकाण.  आतापर्यंत पठारावरून चालत आलेला प्रवास आता वरच्या दिशेने सुरु होणार होता व आताची वाट म्हणजे घनदाट जंगलातली वाट.
 
वाटेवरील हनुमान मंदिर
               इथून पुढे १० मिनिटं चालत गेल्यास डाव्याबाजूने जाणारी वाट ही थेट गडावर घेऊन जाते ही वाट म्हणजे घनदाट जंगल आणि पाऊस असल्याने कोसळणाऱ्या धबधब्यांची वाट. ह्या सगळ्याची मजा घेत आम्ही आता माणिकपासून फक्त २० मिनिटं दूर होतो.  एक चढण पार केली आणि थेट धुक्याच्या साहाय्याने आम्ही गडावर प्रवेश केला



गडावर पोहोचण्यासाठी जंगलवाट          
               गडावर प्रवेश करताच प्रथम एक पाण्याचं टाकं आणि तटबंदी नजरेस पडली.  तेव्हा खात्री पटली की आपण गडावर प्रवेश केला. गडावर एकूण पाण्याची ४ टाकं आहेत. ह्या तटबंदीला डाव्या हाताला ठेवून उजव्या हाताने वर केल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो.

 गडाची तटबंदी
             गडावर प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधून आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात. कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात. येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरुवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो.
चुन्याचा घाणा
प्रवेशद्वार
धान्याचं कोठार व दुसरं प्रवेशद्वार
 गडावरील पाण्याचं टाकं 
जिंकलस गड्या!!!
              उन्हाळ्यात आल्यास किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो. गडाच्या मागच्या बाजूस जाऊन गावचा परिसर न्याहाळला धुक्यांनी भरलेल्या ह्या दरीत पाऊस वर आणि ढग ह्या तिघांचा खेळ बघण्यात वेगळीच मजा येत होती

स्वर्गसुख 
            पावसाचा अंदाज घेऊन आता आम्ही जेवायला सुरुवात केली. पण शेवटी पाऊस आलाच. मग काय पावसातच जेवलो व पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. एव्हाना अडीच वाजले होते. उतरताना वेळेचा अंदाज घेतला व चालीचा वेग वाढवला तरीही खाली पोहोचण्यास साडेपाच वाजले.
         दिसायला छोटेखानी वाटणारा हा गड पण त्यास पोहोचण्यासाठी असलेली वाट ही दमछाक करणारी आहे. म्हणून माणिकगड करावयाचा झाल्यास तो पावसाळ्यातच करावा. येताना गाडीच्या खिडकीतून आम्हाला पुन्हा माणिकगडचं झालं तेव्हा आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो ह्या गोष्टीवर आम्हालाच विश्वास बसत नव्हता. अखेर सगळ्या आठवणींची पुंजी घेऊन कर्जत स्टेशनवरून परतीची ट्रेन पकडून घर गाठलं.
पुन्हा भेटुत.... लवकरचं .

Saturday, 22 June 2019

इर्शाळगडचे नेढे : एक स्वप्नवत प्रवास (IRSHALGAD FORT)

             २०१९ च्या पावसाळी ट्रेक ची ही पहिलीच वेळ. मुळात पाऊस सुरू झाला आहे की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न म्हणून एखादा छोटासा ट्रेक करायचा विचार होता. त्यात भारत-पाकिस्तान सामना असल्याने कोणी सोबत असेल की नाही हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न. म्हणून छोटा कोणतातरी ट्रेक करण्यापेक्षा केलेलाच पण पूर्ण न झालेला घेणं योग्य वाटलं व म्हणून "इर्शाळगड" करायचं ठरवलं. कारण होतं ते म्हणजे नेहमी खुणावणारं नेढं  "नेढं म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेलं छिद्र"
 किल्ले इर्शाळगड
             अखेर येण्यासाठी ४ जण तयार झाले.खरंतर इर्शाळगड ह्याआधी दोन वेळा केला आहे पण काही न काही कारणामुळे नेढ्यापर्यंत पोहोचण्याची संधी हुकली म्हणून ह्यावेळी मुद्दाम इर्शाळगड करायचं ठरवलं. वातावरण ऊन पावसाचं होतं ट्रेन मध्ये होतो तेव्हा तर फक्त ऊनच दिसत होतं. द्विधा मनस्थिती होत होती पण ह्यावेळी मनाशी ठरवलं होतं की नेढ्यापर्यंत जायचं म्हणजे जायचंच.
ह्याच नेढ्यात जायचंय !!!
              सकाळी ८ वाजताची कर्जत लोकल पकडून ९ ला कर्जतला पोहोचलो. तिथून रिक्षा घेऊन थेट "नंबराची वाडी" गाठलं. बरोबर ९.५० ला ट्रेकला सुरूवात केली. मागच्यावर्षी पेक्षा ह्यावर्षी एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे जागोजागी दिशादर्शक लावण्यात आले आहेत. दिशादर्शकाच्या साहाय्याने गडावर पोहोचण्यास सोपं आहे गाईडची गरज नाही

दिशादर्शक
इर्शाळगडावर जाणारी पाऊलवाट
                गावातून निघणारी एकमेव वाट हि आपल्याला थेट इर्शाळवाडीत घेऊन जाते. डाव्या बाजूला मोरबे धरण व उजव्या बाजूला माणिकगड आणि कर्नाळा ह्यांना पाहत पाहत इर्शाळगडाच्या मध्यवर्ती वाडीवर जाऊन पोहोचलो ते म्हणजे इर्शाळवाडी. जेमतेम १५-२०  घरांची असणारी हि वाडी बऱ्यापैकी उंचावर असल्याने ह्या ठिकाणी ना वाऱ्याची कमी ना शांततेची म्हणजे थोडक्यात काय तर "स्वर्गसुख".
मोरबे धरण
इर्शाळवाडी
           इथून सुमारे दहा मिनिटांचा रस्ता हा पाऊलवाटेचा आणि त्यानंतर उजव्या बाजूचा रस्ता थेट इर्शाळगडावर घेऊन जातो. उन्हाळा नुकताच संपत असल्याकारणारे रानमेवा खाण्याची संधी मिळाली वाटेच्या दोन्ही बाजूस करवंदाची प्रचंड झाडं. त्यामुळे हि संधी आम्ही अजिबात सोडली नाही
रानमेवा
          आम्ही पहिल्याच रविवारी गेल्या कारणारे गावकरी आपल्या रोजगारासाठी खाद्यपदार्थ विकण्यासाठी म्हणून कुडाच्या काठ्यांची दुकानं उभारत होती.  त्यांनासुद्धा रोजगाराची ऐन संधी चालून येत होती त्याची ते तयारी करत होते. कारण इतक्या टोकावर आल्यावर कोणालाही निदान लिंबू सरबत पिण्याची इच्छा होणं तर साहजिकच आहे. मग अश्या पर्यटकांसाठी हे देवदूतच ठरतात.
रोजगारासाठी सुरु असलेली धडपड          
               मागे वळून पाहिलं तर समोर एक ढगातून तुफान पाऊस पडताना दिसला आणि त्यावरून एक अंदाज बांधला की हा ढग काहीच वेळात आपल्या डोक्यावर नक्की येणार म्हणून चालीचा वेग वाढवला. एव्हाना आम्ही इर्शाळच्या सुळक्याजवळ होतो.
इर्शाळगडचा सुळका
             तो सुळका मागच्या वर्षी पाहिल्याने ह्यावेळी जास्त वेळ तिथे न घालवता पुढे निघालो कारण ह्यावेळी  माझं लक्ष फक्त नेढ्यात पोहचण्याकडे होतं म्हणून सुळक्याला बगल देत पुन्हा डाव्या हातचा रस्ता धरला तेवढ्यात थोड्यावेळी पाहिलेला ढग आता आमच्या डोक्यावर होता. पाऊस आला म्हणून एका दगडाखाली आम्ही सगळे विसावलो. काही क्षणांपुरताच असणारा हा वरुणराजा पुन्हा मार्गी लागला व त्याबरोबर आम्हीही मार्गस्थ झालो.
ढगफुटी काय म्हणतात ती हीच का?
           आता असणारी पाऊलवाट ही थेट नेढ्याकडे जाणारी होती. गेले २ वर्ष नेढ्याचा पाठलाग करताना तो पाठलाग संपला नाही पण ह्यावर्षी मात्र तो मुहूर्त नक्की होता. बरं २ वर्ष नेढ्यापर्यंत का पोहचू शकलो नाही तर २०१७ साली नेढ्याच्या वाटेवर असताना सुद्धा पावसामुळे नेढं दिसलं नाही आणि २०१८ साली इर्शाळगडावरून दरड कोसळल्याने नेढ्यापर्यंतचा रस्ता बंद होता तर सांगायचा मुद्दा हा की नेढ्यापर्यंत जाण्यासाठी ह्यावर्षी त्या कोसळलेल्या दगडातून फक्त एकावेळी एक माणूस जाऊ शकतो इतकीच वाट तयार केली आहे.
दरड कोसळल्यानंतर तयार केलेली वाट
            ही वाट पार केली आता बरोबर आमच्या उजव्या हाताला डोक्यावर नेढं होतं. ही वाट मात्र खडतर आहे पण ठरवलं तर चढू शकतो माझ्यासाठी तर ही ३ वर्षाच्या स्वप्नाची वाट होती. त्यामुळे इथे येऊन माघार घेणं शक्यचं नव्हतं म्हणून अर्धा पल्ला पार केला पुढे पाहिलं तर तिथून वर जाण्यासाठी एक ४ पायऱ्यांची शिडी बांधलेली आहे. तेव्हा उजव्या बाजूस एक पाण्याचं टाकं व डाव्या बाजूस एक देवीची मूर्ती दिसली तिला नतमस्तक होऊन अखेर शिडीवरून नेढ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
ध्येयाकडची वाटचाल
वाटेवरील देवीची मूर्ती
               शिडीवर चढून अखेर मला माझं लक्ष्य डोळ्यासमोर दिसलं सगळ्यात पाहिले नेढ्यात जाऊन तिथल्या तुफान हवेचा मनसोक्त आनंद घेतला. बऱ्याच वर्षांची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना मनात होती. कारण जवळपास पोहचूनही ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही ह्याचं दुःख काय असतं ते मला ह्या ट्रेक ने दाखवून दिलं होतं. एव्हाना साडेबारा वाजले होते म्हणून आरामात शांतपणे १० मिनिटं तिथेच विसावा घेतला.
नेढ्यातून टिपलेले दृश्य
हुश्श... अखेर पोहोचलो
          नेढ्यातून  मागे वळून पाहिलं तर अजून वर जाण्यास एक वाट होती तिथून वर गेलो हवेचा तुफान मारा सुरु होता पण शेवटपर्यंत  जायचं हे मनाशी ठरवून आलेलो म्हणून तिथपर्यंत गेलो तिथे सुद्धा एक पाण्याचं टाकं होत म्हणजे ह्यावरून एक गोष्ट लक्षात आली की गडावर पाण्याचे मुबलक स्त्रोत उपलब्ध आहेत. समोर इर्शाळचे सर्वोच्च टोक दिसत होते.
सर्वात उंचावरील पाण्याचे टाके      
इर्शाळचे अखेरचे टोक  
             पुन्हा एकदा आकाशाकडे पाहिलं तर पुन्हा पावसाची चिन्ह दिसत होती म्हणून पटकन खाली उतरण्यास सुरुवात केली पण तो खडतर टप्पा ओलांडला आणि पुन्हा पाऊस आला म्हणून मग त्या देवीच्या मूर्तिपाशी विसावा घेण्यास थांबलो तोच मगाशी पाहिलेल्या दृश्याच्या बरोबर विरुद्ध दृश्य नजरेस पडलं म्हणजे आम्ही उभे होतो तिथे पाऊस आणि समोर ऊन.
ऊन पावसाचा खेळ 
             ते दृश्य कॅमेरात टिपून पुन्हा सुळक्यापाशी येऊन जेवणासाठी म्हणून थांबलो. सुमारे १ तास विश्रांती घेऊन बरोबर दीड च्या सुमारास परतीच्या प्रवासाला सुरुवात केली उतरतानाचा वेग अगदी मंद होता पावसाची ये-जा चालूच होती त्याची पूर्ण मजा घेत बरोबर ३ वाजता पुन्हा गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. गावातली मूलं क्रिकेट खेळात होती त्याच्याशी गप्पा मारून अखेर त्यांचा निरोप घेतला.
क्रिकेट खेळणारी मुलं
               आयुष्यभर हा एक ट्रेक त्या नेढ्यासाठी म्हणून लक्षात राहील. परत कधी इर्शाळगडावर यायची संधी मिळाली तर पुन्हा नक्की येऊ खरंतर माझ्यामते हा ट्रेक प्रसिद्ध व्हावा तो म्हणजे इथल्या तुफान वाऱ्यासाठी आणि हा तुफान वारा अनुभवायचा असेल तर एकदा ह्या नेढ्यात येऊन बघा घरातला AC सुद्धा काहीच वाटणार नाही इथल्या वाऱ्यासमोर. 
                शेवटी निसर्गासमोर श्रेष्ठ असं काहीच नाही आणि म्हणूनच ह्या सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतला त्याचा सार्थ अभिमान वाटतो.
सध्या इतकंच , पुन्हा भेटूत....

विजयी जल्लोष