पावसाळा सुरू झाल्यावर रविवारच्या दिवशी घरी राहणं हे म्हणजे नुसतं पाप नसून हा एक गुन्हा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून माणिकगड नंतर काय करायचं ह्याचा शोध सुरू झाला आणि छोटं-मोठं, छोटं-मोठं करता करता गाडी "त्रिंगलवाडी "जवळ येऊन थांबली. बऱ्याच दिवसापासून नाशिकच्या बाजूची भ्रमंती झाली नसल्याने मुद्दाम नाशिकला जायचं ठरवलं.
त्रिंगलवाडी
कल्याण वरून सकाळी आठ वाजताची ट्रेन पकडून साडेनऊच्या सुमारास कसाऱ्याला पोहोचलो. नाश्ता वगैरे करून साडेदहाच्या सुमारास कसाऱ्याहुन त्रिंगलवाडीच्या दिशेने प्रवास सुरु केला. पाऊस सुरु असल्यामुळे कसारा घाटातच बरेच धबधबे दिसले. त्रिंगलवाडी म्हणजे इगतपुरीहुन सुमारे आठ किलोमीटरवर असणारं छोटंसं गाव. ट्रेक जरी त्रिंगलवाडी असला तरी त्याचं पायथ्याचे गाव म्हणजे "तळ्याची वाडी". भर पावसात ११.३० च्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यावर गावचं निसर्ग डोळ्यात भरणारं होतं, पावसाळा असल्याने शेतातली कामे जोरात चालू होती. वाटेत काही गुराखी गुरांना घेऊन बाहेर पडले होते.
कसारा घाट
गावातली हिरवळ
गुराखी
इकडे यायच्या आगोदर ऐकलं होतं धबधब्याच्या दिशेने जायचं आहे पण इकडे पोहोचल्यावर पाहिलं तर जिथे बघावं तिथे धबधबेच आहेत. त्यात त्रिंगलवाडी कुठे आहे तेच दिसत नव्हतं म्हणून गावातून गाईड घायचं ठरवलं.
कुठे जायचं नक्की???
मग मोठ्या माणसाला कोणाला तरी घेण्यापेक्षा गावातली लहान मुलं बरी पडतात म्हणून मग एका लहान मुलाला विचारलं येतो का?? तर तो खुश होऊन हो म्हणाला. सोबत त्याची बहीण पण आली. पण त्यांच्या कडे ना छत्री होती ना रेनकोट. पण फक्त पैसे मिळणार म्हणून ह्या तुफान पावसात यायला तयार झाले त्या मुलाचं नाव देविदास आणि ताईचं नाव कल्पना. देविदासकडे पाहिलं तर तो बिचारा कुडकुडत होता पण त्याने पूर्ण प्रवासात एकदाही माघार नाही घेतली त्यांच्याकडे बघून एक गोष्ट नक्की लक्षात आलं की "आपल्याकडे आधीपासूनच अच्छे दिन आहेत ह्यांच्यापर्यंत ते पोहचण्याची गरज आहे". त्या दोघांकडे बघून मन भावुक झालं.
कल्पना आणि देविदास
गडावर जाणाऱ्या वाटेची सुरुवातच ओढ्यातून झाली आमचा पूर्ण ग्रुप तो ओढा ओलांडून शेतातल्या वाटेला लागला. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य म्हणायचं झाला तर चहूबाजूंनी डोंगर आणि त्यावरून बेफामपणे कोसळणारे धबधबे. सगळं सौंदर्य कॅमेरात टिपून पुढे निघालो.
किल्ल्याकडे जाणारी पायवाट
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांवरून लक्षात येते की किल्ल्याची निर्मिती हि १० व्या शतकात झालेली असावी. पायथ्याशी असलेल्या ह्या लेणीमध्ये जैन धर्मगुरू पाहिले हे आसनस्थ असलेली एक गुहा आहे. आत किर्र काळोख असल्याने आतील वास्तू नजरेस पडत नाही पण गुहेच्या बाहेरील बाजूस असणारे कोरीवकाम आजही आपले लक्ष वेधून घेते. ह्या लेणीच्या बाहेर बरीच मोडकळीस आलेली शिल्पे दिसतात. काही काळ विसाव्यासाठी ही गुहा उत्तम आहे.
जैन लेणी
प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील शिल्प
आतील बाजूस असलेले खांब
बाहेरील शिल्प
तिथून डाव्या बाजूस पडणाऱ्या दिसणाऱ्या धबधब्याच्या दिशेने वर गेल्यास आपण गडाच्या दिशेने मार्गस्थ होतो. चालता चालता मध्येच मागे वळून पाहिल्यास गावचा सुंदर नजारा पहावयास मिळतो. पुढे थोडंस चालत गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो तिथे पोहोचल्यावर समोर त्रिंगलवाडी व डाव्याबाजूस तळ्याची वाडी. इथे तुफान वारा असल्याकारणाने ५ मिनिटं थांबून पुढे निघालो.
तळ्याची वाडी
पुढे जात असता दोन दगडाच्या मध्यभागी एक विंचू दृष्टीक्षेपात आला इतक्या वर्षात साप खेकडे हे येता जाता दिसायचे पण विंचू हा पहिल्यांदाच दिसला होता त्याचं परफेक्ट फोटो सेशन करून पुन्हा आपला प्रवास सुरु ठेवला.
धुक्यातला त्रिंगलवाडी
ध्यानमंदिर
आता आली ती गडावर थेट वर जाण्याची असलेली वाट ती म्हणजे खडकात खोदून तयार केलेल्या पायऱ्या. सुरवातीला खडतर असणाऱ्या ह्या पायऱ्यांची नंतर आपल्याला सवय होते. धुकं असल्याकारणाने सुरवातीला पायऱ्याचं वरचं स्वरूप काहीच दिसत नव्हतं म्हणजे खऱ्या अर्थाने ते सगळ्यासाठी चकित करणारं होतं. त्या पायऱ्यांची उंची म्हणजे चालताना गुडघे छातीपर्यंत पोहोचतात. पायऱ्या संपल्यावर हनुमानाची एक भव्य कलाकृती डोळ्यासमोर उभी ठाकली. गडद भगव्या रंगात रंगवलेल्या ह्या हनुमानाच्या मूर्तीचं तेज डोळ्यात भरतं.
जाण्यासाठी असणारी पायऱ्यांची वाट
जय हनुमान
गडाचं मुख्य प्रवेशद्वार
शेजारीच गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्यातून प्रवेश केल्यावर आपण थेट गडाच्या आवारात प्रवेश करतो. त्यापुढे चालत गेल्यावर डावीकडे असणार्या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणारी पायवाट दिसते. ह्यावाटेवरून गेल्यावर सर्वात वरती एक शंकराचे मंदिर लागते. त्या मंदिराचे दर्शन घेतले. एव्हाना एक वाजल्याकारणाने भोजनाची वेळ झाली होती म्हणून आम्ही सगळे व कल्पना आणि देविदास ह्यांना सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसवले.
सर्वोच्च माथा
महादेवाचं मंदिर
हर हर महादेव
देविदासच्या थंडीमुळे कुडकुडणाऱ्या शरीराकडे बघून पडणाऱ्या पावसाकडे बघून सुद्धा राग येत होता. त्यांना पोटभर जेवायला देऊन आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो येताना आमच्याकडे बराच वेळ असल्याने आरामात खाली उतरण्याचा निर्णय घेतला परतीचा प्रवास वेगळ्या वाटेने असल्याने उतरताना एका बाजूस एक धान्याचे कोठार दिसले व पुढील बाजूस उतरण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या. ह्या पायऱ्यांच्या बाजूसच एक धबधबा होता तिथे तोडा वेळ घालवून व निसर्गाचा पूर्ण आस्वाद घेऊन सुमारे तीन वाजताच्या सुमारास आम्ही पुन्हा तळ्याच्या वाडीत उतरलो.
धान्याचं कोठार
छोटेखानी गुहा
धमाल , मजा आणि मस्ती
देविदास व कल्पना ला त्यांचं मानधन देऊन आम्ही पुन्हा कसऱ्याच्या दिशेने रवाना झालो कसाऱ्याला येऊन कडक कॉफी घेतली आणि पुन्हा संध्याकाळचा नाष्टा करून साडेसहाची लोकल पकडली. गप्पा मारत मारत साडेसात वाजता पुन्हा घरी परतलो.
अजय साडेसात बरं का!!!😜😜


















































































