Sunday, 27 August 2017

पावसाळा आणि कर्नाळा जुळून आलेला एक योगायोग (TREK TO KARNALA FORT)

                "जंगलवाट हीच आपली पाऊलवाट" हेच जगण्याचं उद्धिष्ट समजून सुरु असलेला प्रवास ह्यावेळी कर्नाळ्यापाशी येऊन थांबला. खरंतर कुठे जावं हा प्रश्न होता कारण आमचा मित्र सागर आजारी असल्यामुळे मी आणि उर्मिला आम्ही दोघेच जण स्वारीला तयार होतो म्हणून त्याने केलेला आणि उर्मिलाने न केलेला असा एखादा ट्रेक करावा असं ठरलं. जवळपास चा ट्रेक म्हणून कर्नाळ्याची निवड झाली. 

        अखेर रविवार चा दिवस उजडला गाडी घेऊन जायचं ठरल्यामुळे उर्मिला सकाळी  ८.३० च्या सुमारास ट्रेन ने अंबरनाथ ला आली तिथून आमचा प्रवास सुरु झाला. पाऊस असल्याकारणाने तशी ४० कि.मी च्या वेगानेच प्रवास चालू होता. आठवडाभर पाऊस नव्हता म्हणून उर्मिला म्हणत होती "माझी देवाकडे प्रार्थना आहे कि रविवारी थोडातरी पाऊस असावा" पण तिच्या प्रार्थनेत इतकी ताकद असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण प्रवासाच्या सुरुवातीपासून अगदी घरी पोहचेपर्यंत १ सेकंदही पावसाने विश्रांती घेतली नव्हती.


            "जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना" अशी गाणी गात आमचा प्रवास चालू होता. सुमारे ९.३० च्या दरम्यान आम्ही पनवेल पाशी पोहचलो. नाश्ता करण्याच्या उद्देशाने आम्ही पनवेल कडून अलिबाग च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला वाटेवर नाश्ता करण्यासाठी थांबलो पाऊस उसंत घेत नसल्यामुळे वेळ वाया न घालवता पुढे जायचं ठरवलं. समोर कर्नाळा दिसायला लागलाच होता तेवढ्यात समोर एक संकट सुद्धा नजरेस पडलं सुमारे १० कि.मी पुढे अंतरावर एक ट्रकचा अपघात झाला होता त्यामुळे ट्राफिक जॅम होतं.
 
      वर दिसणारा कर्नाळा किल्ला आणि समोरील ट्रॅफिक
 एकदा मनात विचार आला होता कि गाडी इथेच लावून चालत जावं पण मग म्हंटल बाईकच आहे बाजूने वाट काढून जाऊ असं म्हणून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. सुमारे २० मिनिटाच्या प्रवासाला एक तास लावून आम्ही १०.५० च्या सुमारास कर्नाळ्याच्या पायथ्याशी पोचलो.
कर्नाळा पक्षी अभयारण्याचे प्रवेशद्वार
            प्रवेशद्वारापाशी सगळ्या पावत्या फाडून आम्ही आत प्रवेश केला. सुमारे १ किमी पर्यंत पक्षी अभयारण्य असल्यामुळे तिथपर्यंत थोडी गर्दी दिसली पुढे गर्दी विरळ होत गेली. पक्षी अभयारण्य सोडल्यावर आपल्याला लगेचच जंगलात प्रवेश केल्याची जाणीव होते.

               गर्दी नसल्यामुळे शांतता अनुभवत आम्ही आमची पायपीट चालू ठेवली. थोडंसं पुढे गेल्यावर वाटेवर  एक झरा दिसला तिथेच थोडसं फ्रेश झालो आणि पुढे चालू लागलो कारण मागून गर्दीचा आवाज येत होता पुढे गेल्यावर जंगलाचा प्रत्यय आलाच कारण बाहेर पाऊस असताना सुद्धा घनदाट झाडीमुळे आमच्यापर्यंत त्याचा मागमूस हि नव्हता.
वाटेवरील झरा
           निसर्गाबाबतच्या गप्पा मारत मारत आम्ही रुळलेल्या वाटेने आमचा प्रवास चालूच ठेवला होता. कर्नाळ्यातील पाऊलवाटेवर दिसणारी महाकाय वृक्ष हिच ह्या जंगलाची शान म्हणावी लागेल कारण ह्याच भव्य दिव्य वृक्षाची दूरदूर खोलवर रुजलेली मुळे व त्याच मुळांनी घट्ट धरून ठेवलेली ती माती ज्यामुळे आजही गडावर जाण्यास हि वाट सुरक्षित आहे.
               ही वाट पार करून आता आम्ही गडाच्या समोर होतो. पाऊस असल्याकारणाने थकवा जाणवला नाही पण समोर दिसणारा सुळका हा आमचं लक्ष वेधून घेत होता.  गो. नि. दांडेकरांच्या "जैत रे जैत" मुळे अधिक प्रसिद्ध झालेला हा लिंगोबाचा डोंगर.  आजूबाजूला असणारी हिरवळ व समोर दिसणारा लिंगोबाचा डोंगर हे अप्रतिम दृश्य कॅमेरात कैद केलं व गडाच्या दिशेने प्रस्थान केले
लिंगोबाचा डोंगर 
         आता काहीसा रस्ता हा सपाटीचा होता त्यामुळे थकायचा काही प्रश्न नव्हता आता आमच्या चालीचा वेगसुद्धा वाढला होता . थोड्याच वेळात पुढील चढण नजरेस आली ती चढण सुरु व्हायच्या अगोदर उजव्या बाजूस देवीची एक घुमटी आहे तेथूनच आपण दुर्गद्वारात  पोहोचतो. तिथेच देवीचे दर्शन घेतले.  समोर विश्रांतीसाठी जागा होती पण बसायची इच्छा नव्हती कारण आता आमचं ध्येय आम्हाला खुणावत होतं. 
देवीचे छोटेखानी देऊळ
             आमच्या वेगाने आम्ही आमच्या लक्ष्याचा पाठलाग करत होतो आणि आता समोर नजरेस होता तो इतका वेळ आमचं लक्ष वेधून घेत असलेला  लिंगोबाचा डोंगर व डाव्याबाजूस गडाचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वार इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्याच थाटात उभे आहे ह्यातून प्रवेश करताना आजही स्वराज्यात प्रवेश करतानाचा अनुभव येतो.

       डाव्या बाजूस प्रवेशद्वार व उजव्या बाजूस असलेला सुळका
       ह्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोरच गडाच्या इतिहासाची नोंद दिसते. गडाचा इतिहास पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा किल्ला यवनांकडून जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला व ह्या किल्ल्याचे  किल्लेदार म्हणून स्वातंत्रवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा म्हणजेच अनंत रामचंद्र फडकेह्यांची निवड केली 
गडाचा इतिहास
                  प्रवेशद्वारातून थोडं  पुढे गेल्यास डाव्या बाजूस एक वाडा व समोर साधारण  ४० ते ५० मीटर उंच सुळका नजरेस भरतो.  त्याच्या तळाशी असलेले पाण्याचे साठे हे सुमारे १२-१३ व्या शतकात बनवलेले आहे ते आजही आपल्याला  सुस्थितीत पहायला मिळतात . आता पर्यटकांच्या  सुरक्षेसाठी म्हणून तिथे लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

गडावरील पाण्याचा साठा
              काही पाण्याच्या टाक्या ह्या पर्यटकानी बाटल्या कचरा टाकून खराब केल्या आहेत पण त्यातील दोन टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे. आजूबाजूचे काही इमारतीचं अवशेष आजही आपलं लक्ष वेधून
घेतात. खरंच मनात विचार येतो कि आजकालच्या इमारती २५ वर्षे टिकल्या तरी आपण नशीब समजतो आणि इतिहासातील गोष्टी वादळ, वारा, पाऊस ह्या सगळ्यांचा मारा सहन करत आजही त्याच दिमाखात उभ्या आहेत.
गडावरील इमारतीचे अवशेष
                थोडं पुढे गेल्यावर कर्नाळ्याची तटबंदी नजरेस पडते व तिथून खाली पाहिल्यास आपल्याला आपल्या उंचीचा अंदाज येतो. तेथे थोडावेळ फोटो काढून आम्ही आमच्या पारतीच्या वाटेला लागलो कारण मागून गर्दी वाढतच होती. ३ वाजले असल्याकारणाने एव्हाना भूक सुद्धा लागली होती गडावरून खाली पाहिल्यावर लक्षात आलं कि सकाळचं ट्राफिक मोकळ झालं आहे ते पाहून आम्ही सुटकेचा निश्वास सोडला
  परतीच्या वाटेवरील एक दृश्य
            वाटेवर एक आडोसा पहिला आणि आमच्याकडे असलेले  खाण्याचे पदार्थ बाहेर काढले व खायला सुरुवात केली. उतरताना वाट निसरडी होती त्यामुळे हळूहळूच चालावं लागणार होतं हे आम्हाला ठाऊक होतं कारण वरुणराजाची कृपादृष्टी आमच्यावर जरा जास्तच होती.
परतीच्या वाटेवर होणारी कसरत
           एकमेकांना हात देत देत आम्ही सुमारे सव्वाचार च्या सुमारास गडाचा पायथा गाठला व सकाळच्या ट्राफिकची भीती मनात ठेवून आम्ही सगळ्यात आधी पनवेल सोडायचा निर्णय घेतला. सुमारे ५ च्या सुमारास आम्ही शिळफाट्याला पोहोचलो आणि आश्चर्य म्हणजे तिथे अजिबात ट्रॅफिक नव्हतं तेव्हा मी उर्मिलाला म्हणालो उर्म्या रस्ता चुकलो  तर नाही ना ग??  तेव्हा ती पण हसली. कारण शिळफाट्याला ट्रॅफिक न लागणं हा सुद्धा एक चमत्कारच आहे.
         आता भूक लागली असल्याकारणाने आणि आम्ही  वेळेतच असल्याने लगेच जवळच प्रसिद्ध असलेल्या कोकणकींग हॉटेल मध्ये जेवायला गेलो. चिंब भिजल्यामुळे माझी अवस्था बघण्यासारखी होतो. मी अक्षरशः कापत होतो. वेटर ने आम्हाला विचारलं काय देऊ??? तेव्हा आम्ही त्याला मस्करीत बोललो जे गरम असेल ते दे. तिथे पोटभर जेवलो.  तरीही बाहेरचा पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. मग सगळं सामान बागेत ठेवलं व थेट उर्मिलाचं घर गाठलं आणि घरी पोचल्या पोचल्या उर्मिलाच्या आईला म्हंटल "पाणी नाही दिल तरी चालेल पण चहा द्या"
       त्यांनी बनवलेला तो चहा म्हणजे स्वर्गसुख होत त्यासाठी काकू तुमचे खूप खूप आभार.
तो चहा घेतला. थोड्या गप्पा मारल्या आणि मी माझ्या घरच्या वाटेला लागलो. अशाप्रकारे हा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाला. उर्मिला तुझ्या  इच्छाशक्तीवरच हा ट्रेक पूर्ण झाला आहे. त्यासाठी तुझे आभार. नेहमी अशीच तयार रहा आणि  सागर  मित्रा लवकर बरा हो.
अजून बरंच काही बाकी आहे!!!.
चला आत्तापुरती विश्रांती घेतो पुन्हा लवकरच भेटूत....
चिंब भिजलेले...  

6 comments: