Saturday, 18 August 2018

स्वराज्याच्या जीवाचे धन - किल्ले जीवधन (Jivdhan Fort)

         खरंतर ह्या रविवारी आराम करायचा विचार होता कारण जवळपास गेले सात आठ रविवार ट्रेक वर ट्रेक चालू होते. शनिवारी ऑफिसला गेलो आणि अचानक माझा मित्र इरफानचा मेसेज आला काय करतोय???
मी - ऑफिसमध्ये आहे.
इरफान- ये पुण्याला उद्या ट्रेक ला जाऊ.
मी - कुठे??
इरफान- अंधारबन नाहीतर जीवधन.
मी - अंधारबन झालंय जीवधन करू.
जीवधन झाला नव्हता म्हणून त्याला २ मिनिटातच मेसेज केला येतोच मी.
तसेच 2 वाजताच्या कन्याकुमारी एक्सप्रेसचं तिकीट काढलं आणि ऑफिसमधून निघून थेट कल्याण गाठलं. कन्याकुमारी एक्सप्रेस पकडली आणि ७.३० ला पुण्यात पोचलो. इरफान माझ्या आधी स्टेशनला येऊन पोहोचला होता. मग काय गाडीत बसलो आणि घराकडे निघालो. वाटेतच कसं जायचं किती वाजता निघायचं सगळं प्लांनिंग केलं. त्या हिशोबाने रात्री जेवलो आणि १२ ला झोपलो आणि  सकाळी ६ वाजता प्रवासाला सुरुवात केली. वाटेत कुठे थांबायला लागू नये म्हणून आधीच नाश्ता केला आणि प्रवासाला लागलो.
खरंतर जीवधनला दोन वाटेने जाता येते
एक म्हणजे कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजूला जाणारी वाट जीवधनकडे जाते आणि दुसरी वाट म्हणजे जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट.
            ह्यावेळी आम्ही जुन्नर मार्गे जात होतो त्यामुळे पुणे, चाकण, राजगुरूनगर, मंचर मार्गे आम्ही जुन्नर मध्ये प्रवेश केला तोच समोर नजरेस पडलं ते शिवजन्मस्थान म्हणजेच "किल्ले शिवनेरी".
शिवजन्मस्थान  शिवनेरी
              जुन्नर मध्ये त्यादिवशी बाजार भरला होता म्हणून गाडीतून उतरून थोडीशी खरेदी केली. जुन्नर हुन १३ किलोमीटरवर जीवधन किल्ला आहे वाटेत चावंडचा किल्ला लागला सुरवातीला धुक्यात असल्याने अंदाज बांधू शकलो नाही पण जसजसे जवळ पोहोचलो तसं लक्षात आलं हाच "चावंड".
 किल्ले चावंड 
           चावंड पासून ६ किलोमीटरवर जीवधनचे पायथ्याचे गाव घाटघर. गाव एकदम टुमदार सुमारे २०-२५ घरं असलेल्या ह्या गावात आम्ही आधी एका घरासमोर गाडी लावली आणि वाटाड्या घेतला. एव्हाना ११ वाजले होते समान वगैरे आवरून आम्ही ११.२० ला गडाच्या दिशेने वाटचाल चालू केली . चढता चढताच त्यांनी विचारलं Rope घेऊ का?? आम्ही म्हंटलं घ्या.
घाटघर
          घाटघर गावातून डाव्या बाजूने जाणारी वाट थेट गडावर घेऊन जाते. पण पावसाळ्यात झुडपं वाढल्यामुळे शक्यतो वाटाड्या घेऊन जाणे गरजेचंच आहे. गावात जवळपास प्रत्येकाच्या उपजीविकेचे साधन हे शेतीच. त्यामुळे गडाच्या जाण्याच्या वाटेच्या दुतर्फा भातशेती दिसत होती. गावाच्या सुरवातीपासूनच प्रचंड वारा आणि धुकं होतं. समोर एक महादेवाचं मंदिर लागलं त्याचे दर्शन घेऊन चढाईला सुरुवात केली.
भातशेती 
  बम बम भोले
           सुरुवातीला लागणार पठारी भाग हळूहळू चढाईचा झाला. आम्ही जसजसे वर जात होतो तसतसे धुक्याचा थर दाट होत होता. गडावर जाणारी वाट ही ३ टप्प्यात विभागली होती असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. सुरवातीला जंगलवाट, नंतर खडकांची वाट आणि वर गेल्यावर फक्त धुकं आणि वारा. सुरवातीलाच समोर दूरवर एक धबधबा नजरेस पडला. आधी विचार आला तिथेच जावं. तेवढ्यात आमचा वाटाड्या म्हणाला अरे तिकडूनच जायचंय.

            मग काय आधी जंगलातली वाट झुडपं बाजूला करून जाण्यात गेली मग आली धबधब्यांच्या पाण्यातुन जाणारी वाट ही वाट थोडीशी खडतर असली तरी ही पण आरामात पार झाली पण पुढे अजून भयंकर वाट होती कारण वरून वाहत येणार्या पाण्याचा प्रवाह आणि पावसामुळे झालेली निसरडी वाट. तेव्हा आम्हाला कळलं Guide ने Rope घेऊ का असं का विचारलं होत ते. पण आता शिडी लावल्यामुळे Rope ची गरज काही पडली नाही पण तरीही कोणाला खात्री नसेल चढायची तर त्यासाठी Rope गरजेचा आहे.

    शिडीवरचा खडतर प्रवास         
          ती खडतर वाट पार गेल्यावर आमच्या समोर एक बंदीस्त गुहा आली वारा आणि पावसापासून वाचण्यासाठी म्हणून आम्ही लगेच त्यात प्रवेश केला पण Guide म्हणाला इथे विंचू पण असतात. त्यामुळे सांभाळून राहा मग आम्ही त्या गुहेचा चारीबाजूने अंदाज घेतला. Guide च्या मते ह्या गुहेमधून जाणारी वाट ही दुसरीकडून बाहेर पडते पण सध्या ती वाट बंद आहे.

मानवनिर्मित गुहा 
आजही त्या गुहेचं अस्तित्व आपल्याला इतिहासाची साक्ष देतं. गुहेतील वरच्या बाजूस असलेले कोरीवकाम आज ही जसेच्या तसे आहे. आत अंधार आणि बाहेर धुकं अश्या BLACK & WHITE परिस्थितीत आम्ही अडकलो होतो पण बाहेरच्या वाढणाऱ्या वाऱ्याचा अंदाज घेऊन आम्ही पटकन गुहेतून बाहेर पडलो आणि गडाच्या दिशेने पुन्हा कूच केली.
 
 BLACK & WHITE
 गुहेतील नक्षीकाम 
           वाटेत ओसंडून वाहणारी पाण्याची टाकी लागली. तिथे पाणी भरून आम्ही पुन्हा वाटेला लागलो तिथून पुढे जीवधनचे पाहिले प्रवेशद्वार लागले. आजमितीस त्या प्रवेशद्वाराचे बरेचसे अवशेष ढासळलेले आहेत पण त्याची एक बाजू भक्कम स्थितीत उभी आहे
.
 जीवधनवरील प्रवेशद्वार 
           आता आम्हाला जीवधनच्या महादरवाजा कडे जायचे होते हा महादरवाजा म्हणजे नाणेघाट वरून जीवधन कडे येण्याचा मार्ग.
 पाण्याचे टाके 
               गडाचा इतिहास पाहता शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती, १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ’मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणार्‍या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले
        आम्ही जीवधन गडावर असलो तरी आम्हाला उतरायचं होत ते नाणेघाटच्या दिशेने. सगळ्यात खडतर प्रसंग जर कुठला असेल तर तो हाच. कारण गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि खालून वेगाने वाहत येणारा वारा आणि ह्या दोघांना भेदून जाणारी वाट. ह्या वाटेने आमची खरंच वाट लागली कारण ह्याच रिव्हर्स वॉटरफॉल ने आमच्यावर तुफान हल्ला केला. मला तर महाभारतातील ते दृश्य आठवलं जेव्हा अर्जुन एकाच धनुष्यातून अनेक बाण सोडायचा.  अगदी तसाच हल्ला होता हा. शेवटी ती वाट पार करून आम्ही पश्चिमदरवाजापाशी पोचलो.
पश्चिम दरवाजा
            हा दरवाजा खऱ्या अर्थाने महादरवाजा आहे. आपल्याकडच्या दुमजली इमारतीच्या उंची एवढी ह्याची उंची आहे तिथून खाली नाणेघाटकडे जाणारी वाट पाहिली. तिथून उतरण्याचा विचार केला पण वारा आणि वेळेचा अंदाज घेतला आणि पुन्हा मागे फिरलो.
 नाणेघाटकडे जाणारी बिकट वाट 
         एव्हाना दीड वाजला होता. बॅगेत होतं तेवढं खाल्लं आणि परतीच्या प्रवासाला लागलो चढताना जेवढी दमछाक झाली नव्हती तेवढी उतरताना झाली कारण वाट पूर्ण च निसरडी होती तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही ते रॉकपॅच व्यवस्थित उतरलो मग पुन्हा जंगलवाट चालू झाली तेव्हा जीवात जीव आला. वाटेत एका धबधब्यावर फ्रेश झालो एक 2 मिनिटांसाठी धुकं बाजूला झालेलं तेव्हा गावचे एक दृष्य टिपलं
 घाटघर  गाव 
          तिथून निघालो आणि थेट गावात जाऊन थांबलो. तिथे पाहिलं तर चूल लावलेली होती तिच्या बाजूला बसून जरा उष्णतेची मजा घेतली तिथे एवढी थंडी होती आम्ही सोडा पण गावातली मांजर पण चुलीच्या बाजूला बसून शेक घेत होती.
           गावच्या त्या मावशींबरोबर गप्पा मारता मारता सगळी माहिती विचारून घेतली त्यांनी अक्षरशः काही काही प्रश्न आम्हाला स्वतःची मुलं असल्यासारखे विचारले. त्यांनी आधी विचारलं लग्न झालं का?? नंतर विचारलं आई वडिलांना सांभाळतो का??? आम्ही सुद्धा त्यांची गमतीशीर उत्तर दिली
त्यांनी निघताना आम्हाला सांगितलं पुढच्या वेळी येताना परिवाराला सोबत घेऊन ये. आणि आम्हीही हो म्हणून त्यांचा निरोप घेतला.
म्हणजे हे असं फक्त गावातच होऊ शकतं. कारण शहरात माणसांचं जंगल झालंय पण गावात आजही माणुसकीची ओढ दिसून येते
सुमारे साडेतीनच्या सुमारास तिथुन निघून परत ट्रॅफिकमुळे रात्री ९ वाजता घरी पोचलो.
असाच हा अचानक भयानक ठरलेला आणि यशस्वी झालेला ट्रेक...
आणि ज्याच्यामुळे यशस्वी झाला त्याचे खूप खूप धन्यवाद.
 Thank  you  IRFAN... 

गावातील काही निसर्गरम्य दृश्य : 




11 comments: