Saturday, 27 January 2018

दोन मंदिरे एक ईश्वर : गोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर (GONDESHWAR & AISHWARYESHWAR TEMPLE)

            गड झाले, विहिरी झाल्या, आता वेध लागले ते  देवळांचे म्हणून ह्या रविवारी प्राचीन मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. थोडीफार शोध मोहीम केल्यावर जवळपासचे ठिकाण शोधण्यास मदत झाली. १२ व्या शतकातील दोन मंदिरे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात आहेत असं समजलं. मी अजय आणि भरत आम्ही तिघांनी योग्य ती माहिती घेऊन रविवारी जाण्याची तयारी केली.
       सकाळी ७.५५ ची कल्याणहुन कसारा लोकल पकडली. साडेनऊच्या सुमारास कसारा गाठले.  कसाऱ्यावरून सिन्नरला जाताना घोटीमार्गे जावे लागते त्यामुळे कसार्याहून घोटीला जाण्यासाठी SHARE जीपने घोटीला गेलो व घोटीहून सिन्नर ला जाण्यासाठी पुन्हा SHARE जीप घेतली. १२ वाजण्याच्या सुमारास सिन्नरला पोहचलो आणि प्रथम गोंदेश्वर मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
गोंदेश्वर मंदिर
         सिन्नर बस डेपो पासून २ किमी अंतरावर असलेले हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला "शैवपंचायतन" म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे.

         आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर
          गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा  शिल्पे कोरलेली आहेत. काही युद्धाची शिल्पे कोरली आहेत.


         



मंदिरातील काही शिल्पे
        मंदिराच्या चहूबाजूला हत्तीची शिल्प आहेत. मंदिराच्या चहूबाजूला असलेल्या ह्या हत्तीच्या शिल्पातील एका हत्तीच्या सोंडेत एकदा एका चोराला हिरा सापडला म्हणून त्याने लालसेपोटी चहूबाजूला असलेल्या सर्व हत्तीची सोंड नष्ट केली अशी आख्यायिका आहे.

सोंड तुटलेल्या हत्तीचे नमुने  
           मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम अशी शिल्पकला आहे. मंदिराच्या बाहेरील शिल्पातून गोष्टीरूपी इतिहास उलगडला जातो फक्त तितक्या अभ्यासू नजरेने आपण पहिले पाहिजे. मंदिरावर काही कामशिल्पेही आढळतात.

मंदिराबाहेरील कामशिल्पे 
            १२ व्या शतकात बांधलेल्या ह्या मंदीरातून निघावस वाटत नव्हतं पण तरीही वेळेचा अभाव असल्याकारणाने २ तास ह्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही येथून काढता पाय घेतला. जेवणाची वेळ उलटून गेलेली म्हणून वाटेत मार्केट यार्डात असलेल्या "जय मल्हार" खानावळीकडे आमचे पाय आपोआप वळले तिथल्या स्पेशल "शेवभाजी" वर ताव मारला आणि जवळच असलेल्या ऐश्वर्येश्वर मंदिराकडे वाटचाल चालू केली.


 ऐश्वर्येश्वर मंदिर
            ऐश्वर्येश्वर मंदिर हे नाशिक-शिर्डी मार्गावर सिन्नर बस डेपोच्या अगोदरच आहे पण आजही बरेच लोक ह्या मंदिरापासून अनभिज्ञ आहेत . गोंदेश्वर मंदिरापासून हे मंदिर सुमारे २० मिनिटाच्या अंतरावर असल्याने आम्ही पायीच जायचं ठरवलं. ऐश्वर्येश्वर मंदिर हे द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे आजही ह्या मंदिरावरील शिल्प आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची कलाकृती असलेले तोरण आजही आपल्याला आकर्षित करते.
प्रवेशद्वारावरील तोरण
       मंदिरात असलेल्या प्रत्त्येक खांबावर उत्तम अशी कलाकुसर आहे. मंदिरात सुबक अशी शिवपिंड आहे. कदाचित रोज कोणीतरी पूजेसाठी येत असावं पण सिन्नर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे मंदिर इतकं शांत पाहून आश्चर्य वाटलं  
 
 ऐश्वर्येश्वर मंदिरातील शिवपिंड 
          
          मंदिराच्या चहुबाजूने निरीक्षण केल्यास वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम दिसते. त्यावर अनेक प्रकारच्या कमानी आहेत  काही ठिकाणी मंदिराचे उंच उंच कळस नजरेस पडतात


 
  
 मंदिराच्या बाहेरील बाजूची शिल्प 
            आज सुमारे ८ शतकापासून हे मंदिर निसर्गाशी झुंज देत उभेआहे. ह्या मंदिराबद्दल जास्त कोणालाही माहिती नसल्यामुळे इथे कोणीच नसते. त्यामुळे इथे गेल्यावर लगेचच शांततेचा प्रत्यय येतो. 
         हि मंदिरे पाहिल्यावर एकदा मनात विचार आला कि आज जसे आपल्याला  काही  सुचलं कि कागदावर रेखाटतो त्याचप्रमाणे त्याकाळची माणसे असं काही सुचल्यास थेट दगडावरच रेखाटत असावी हि दोन्ही मंदिरे पाहिल्यावर आजही कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्या कलाकारांचे खरंच धन्यवाद ज्यामुळे आज आम्हास अशी वास्तु पाहावयास मिळत आहे.
           पुन्हा परत कधी आलो तर एकावेळी एका मिंदीराला भेट देऊ असा विचार करून आम्ही परतीच्या वाटेल लागलो. एव्हाना साडेचार वाजले होते त्यामुळे सिन्नर-नाशिक-कसारा असं येणं शक्य नसल्याने आम्ही येताना नाशिकवरून ट्रेनने यायचा निर्णय घेतला जो खरंच योग्य ठरला त्यानिमित्ताने नाशिक करून खरेदी करता आली.

कधी चुकून माकून नाही तर ह्या मंदिरांना भेट देण्यासाठी म्हणून तरी मुद्दामच सिन्नर शहराला  भेट द्या....

मंदिराबाहेरील काही अप्रतिम दृश्ये  ... 







GOOGLE LOCATION OF GONDESHWAR TEMPLE

GOOGLE LOCATION OF AISHWARYESHWAR TEMPLE

Sunday, 7 January 2018

९व्या शतकातील लोणादित्य रामेश्वर मंदिर (LONADITYA RAMESHWAR TEMPLE)

         अंबरनाथला राहत असल्यामुळे आमच्याकडे पुरातन काळातील एक शिवमंदिर आहे हे आम्ही खूप अभिमानाने  सांगत असू पण एका वृत्तपत्रात आलेल्या माहितीत वाचल्यावर लक्षात आलं कि शिलाहार राजांनी बांधलेली अनेक शिवमंदिरे ठाणे जिल्ह्यात अवशेष रूपाने आजही उभी आहेत. या मंदिरापैकी सर्वाधिक अवशेष रूपाने आपले अस्तित्व प्रकट करणारे लोनाडचे लोणादित्य महादेवाचे देवालय होय. अंबरनाथच्या शिवमंदिराच्या शे-पाउणशे वर्षांपूर्वी ह्या देवालयाची निर्मिती झाली. हे वाचलं आणि कल्याण पासून सुमारे ७ किमी दूर असणाऱ्या ह्या "लोणादित्य रामेश्वर" (LONADITYA RAMESHWAR TEMPLE) मंदिरास भेट देण्यास निघालो.



 मंदिराची मागील बाजू 
            लोनाड  गावातील  तलावाकाठी उभे असलेले हे मंदिर शिलाहार राजांपैकी कोणी आणि कधी बांधले  ह्याचा निश्चित पुरावा नाही पण हे मंदिर खूप पुरातन आहे ह्याचे पुरावे दानपत्रातून व शिलालेखातुन उपलब्ध झाले आहेत. आषाढ वद्य ४, शके १९१९ (इ. स. ९१७) साली शिलाहार राजा अपरादित्य याने भिवंडीजवळील या  मंदिराला देवाच्या पूजेसाठी "दक्षिणायन दान" म्हणून भादाणे गाव इनाम दिला. अशा आशयाचा ताम्रपट सापडला आहे ह्याचा अर्थ लोनाडचे हे शिवमंदिर सुप्रसिद्ध अंबरनाथच्या देवालयाच्या जे २७ जुलै १०६१ मध्ये बांधले होते याच्या आधी शके ९१९ (इ. स. ९१७) च्याही आधी लोनाडचे मंदिर बांधले गेले हे शिलाहार राजाच्या दानपत्रावरून कळते.
 


 मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिल्प 
          द्वितीय अपरादित्य शिलाहार राजाचा मंत्री व्योमशभु यांनी लोनाडच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि गर्भगृहात आपल्याच नावाने व्योमशम्भू महादेवाचे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. लंकेवर स्वारी करण्यापूर्वी समुद्राला साक्षी ठेवून रामाने ज्या शिवलिंगाची स्थापना करून प्रार्थना केली त्याच आकाररूपाचे शिवलिंग या मंदिरात असल्याने या शिवमंदिराला "श्रीरामेश्वर मंदिर" असेही म्हंटले जाते. मंदिरावरील सुबक मूर्तींचे नमुने बघितल्यावर आज हि अवाक व्हायला होतं.

      शिवलिंग 

            मंदिराच्या मागील बाजूस असलेली कलाकुसर 
            गेली कित्येक वर्षे ऊन वारा पावसात ह्या मंदिराची झीज होऊ लागली आहे. बरेचसे अवषेश ढासळले आहेत. पण ते ढासळून सुद्धा त्यावरील कलाकुसर जशी च्या तशी आहे. इतकी वाताहत होऊनही इतके जुने मंदिर त्याच थाटात उभे आहे. मंदिरावरील कलाकुसरीचे काम बघून कलाकारालाही दाद द्यावीशी वाटते. बऱ्याच लोकांना अजूनही ज्ञात नसल्यामुळे  त्या मंदिराजवळ गर्दी कमी असते.



     पडझड झालेल्या वास्तूंचे काही नमुने
          तिथल्या गावकऱ्यांना मंदिराबद्दल माहिती सांगण्यास कोणी आहे का असे विचारल्यावर गावकऱ्यांनी सांगितले कि इतका जुना माणूस गावात शिल्लक नाही.  त्यामुळे आमच्याकडे ह्या मंदिराविषयी पुरेशी माहिती नाही पण असो आज ते मंदिर ज्या पद्धतीने तेथे उभे आहे ते पाहण्याचे भाग्य असणे हे हि नसे थोडके!!! म्हणून आहे त्यात समाधानी राहून ह्याअतिप्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरच्या वाटेला लागलो.

                           
 MAP LOCATION

Monday, 1 January 2018

ऐतिहासिक विहिरींची एक सफर (HISTORICAL STEP WELL)

        रविवारचा  दिवस, संध्याकाळचे काही "Family function" मग अशा परिस्थितीत अर्ध्या दिवसात काय करता येईल असा विचार मनात असतानाच माझ्या मित्राचा फोन आला कि बदलापूर जवळ एक पांडवकालीन विहीर आहे ती पाहायला जाऊ. ठरलं तर मग रविवारी सकाळी आम्ही सकाळी सुमारे ७.३०च्या सुमारास निघालो. बदलापूर शहरापासून ५ किमी अंतरावर  देवळोली  गावात असलेली हि विहीर शिवकालीन कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. ह्याविहिरीला बाराही महिने पाणी असतं ह्या विहिरींची रचना हि शिवलिंगाप्रमाणे आहे. ह्या विहिरीत उतरायला १२ ते १५ पायऱ्या आहेत. अर्ध्या पायऱ्या उतरल्यावर दोन्ही बाजूला दिवे लावण्यास कोनाडे आहेत. विहिरीच्या मुखद्वारावर गणपती आणि इतर देवांच्या मूर्ती आहेत. गावकऱ्यांच्या माहिती प्रमाणे शिवाजी महाराज ह्यवाटेने जाताना येथे घोडे बदलायचे.

 शिवलिंग आकाराची विहीर 

विहिरीचे प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावरील शिल्प

                            
             Google  Location
          नंतर मग आला डिसेंबर महिन्यातला LONG WEEKEND. मनात काहीच योजना नव्हती. खरंतर जायच होतं रोह्याला पण गेलो पुण्याला.  दुसरा दिवस रविवारचा होता कुठे जावं हे पुण्याला जाईपर्यंत ठरलं नव्हतं. साताऱ्याची बारामोटेची विहीर ऐकून होतो म्हंटल तिथेच जावं. पुण्याहुन सकाळी ८.३० च्या सुमारास निघालो ट्राफिक प्रचंड असल्यामुळे साताराला पोचायला ३ तास लागले. पुणे सातारा वाटेवर नागेवाडी नावाचं एक गाव लागत तिथून ४ किलोमीटर आत गेल्यावर लिंब गावात प्रवेश होतो. सुमारे ३०० वर्ष जुनी असलेली हि "बारामोटेची विहीर (BARAMOTECHI VIHIR)" ह्याच लिंब गावात आहे.

                           
 Google  Location  

        ह्या विहिरीचे बांधकाम शके १६४१-४६ या कालावधीत श्रीमंत श्री विरुभाई भोसले यांनी केले विहिरीचा आकार अष्टकोनी व  शिवलिंगाकृती असून खोली ११० फुट व व्यास ५० फुट आहे.विहीरीत महाल आहे.
महालात चित्रे कोरली आहेत. तसेच वाघ, सिंहाची शिल्पे बनवलेली आहेत.विहरीत प्रशस्त असा जिना चोरवाटा आहेत. ह्या महालावर सिहासन व दर्बारीची जागा आहे.विहिरीत १५ मोटा असून इथे एका वेळी १२ मोटा चालत असतात.सातारचे राजे श्रीमंत प्रतापसिह महाराज यांची विहिरीच्या महालात खलबते चालत.

बारा मोटेची विहीर 
 विहिरीतील खांबांवर असलेल्या सुबक कलाकृती 

 प्रवेशद्वारावरील शिल्प 

 विहिरींमधील शिल्प 
         बारामोटेच्या विहिरीवर सुमारे एक तास घालवून आता स्वारी साताऱ्याच्या दिशेने वळवली . बसची वाट बघून बस तर काही मिळाली नाही पण एका दुचाकीस्वाराने सातारा बस स्टॅन्डपर्यंत सोडलं . आता खरा प्रश्न पुढे होता कि जायचं कुठे ?? समोर सज्जनगडची बस उभी होती पण घड्याळात पाहिल्यावर कळलं  कि आधीच २ वाजले आहेत म्हणून मग तिकडे जाण्याचा बेत रद्द केला व कराडला जायचा निर्णय घेतला कराडला "नकट्या रावळाची" विहीर आहे हे ऐकून होतो मग म्हटलं आता तिकडेच जावं . कराड हे साताऱ्यापासून ४६ किमी अंतरावर आहे . २ वाजता पकडलेली बस ३.१५ च्या सुमारास कराड ला पोहोचली . थोडस जेवुन आपला मुक्काम विहिरीच्या दिशेने वळवला. 
            कराड शहरात असलेली विहीर हि तिथल्या किती जणांना माहित आहे कुणास ठाऊक?? कारण मी बस मध्ये असताना २-३ जणांना  विचारलं तुम्हाला माहिती आहे का हि विहीर?? तर ते नाही म्हणाले!!!  एकाने तर मी इतक्या लांबून विहीर पाहायला आलो म्हणून मलाच वेड्यात काढलं.
 नकट्या रावळ्याची विहीर
           खरं पाहिलं तर कराडला ऐतिहासिक वारसा आहे. इथल्याच पंतांच्या कोटात शिवकालीन भुईकोट किल्ला असून, त्याचाच एक भाग म्हणजे येथील 'नकट्या रावळ्या'' (NAKTYA RAWLYACHI VIHIR) ची विहीर !
           कराड शहराच्या वायव्येस कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो तिथेच यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.  ह्याच प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे.आहे. तेथे असणाऱ्या पायविहिरीला स्थानिक नागरिक "नकट्या रावळ्याची" विहीर म्हणून ओळखतात. दगड आणि पांढऱ्या मातीमध्ये बांधलेला पंतांचा कोट आणि कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली प्राचीन गूढ ' नकट्या रावळाची ' ही विहीर सुमारे 41.5 मीटर लांब असून, त्यात 30.5 मीटर लांबीचा सोपानमार्ग व खाली ११ बाय ११ मीटर चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी ९९ पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या कमानीवर नक्षीकाम केलेले आहे .प्रत्येक 20 पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी (सोपान) आहे. पायऱ्या संपतात त्या ठिकाणी दोन मोठ्या दगडी स्तंभावर एक मोठी कमान आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत.12 व्या शतकात 'शिलाहार' राजवटीत नकट्या रावळ्याच्या ही ऐतिहासिक विहिर बांधण्यात आली होती.
          ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारची वर्गवारी असून नकट्या रावळ्याची विहीर ही सातव्या वर्गवारीतील असल्याचे सांगण्यात येते.
विहिरीच्या आतील बाजूने टिपलेले छायाचित्र
      
Google  Location
       सध्या पुरातत्व खात्याच्या अख्यारीत असूनसुद्धा ह्या विहिरींची दुरावस्था दिसून येते. फक्त पाणी जरी स्वच्छ केलं तरी ह्या विहिरीला नवसंजीवनी प्राप्त होईल. खरतर इतकी भव्य असलेली विहीर हि सुट्टीच्या दिवशी रिकामी पहिली आणि मनात थोडंसं दुःख वाटलं पण शांततेचा आनंद मिळाल्याचं समाधान हि लाभलं. कोणी नसल्यामुळे फोटो काढण्यास हि काही अडथळा नव्हता खूप सारे फोटो काढले आणि कराड वरून परत पुण्याच्या वाटेला लागलो. 
          ऐतिहासिक वास्तूंची कोणाला आवड असेल तर मुद्दाम वेळात वेळ काढून नकट्या रावळ्याच्या विहिरीला नक्की भेट द्या.

 
भव्य वास्तूचा अप्रतिम नमुना


Friday, 1 December 2017

शिवजन्मस्थान : किल्ले शिवनेरी (SHIVNERI FORT)

   

          दसरा, रविवार आणि गांधीजयंती म्हणजेच शनिवार, रविवार, सोमवार असा "LONG WEEKEND" आणि अश्या दुर्मिळ योगाचा फायदा नाही उचलला तर कसले आम्ही भटके???  खूप दिवसांपासून हे दिवस डोक्यात होते आणि काहीतरी करायचं हे सुद्धा ठरलेलं होतं पण जावं कुठे हा प्रश्न होता. ऊन जास्त असल्याने उगाच थकवा जाणवेल अश्या ठिकाणी जायचं नव्हतं. बऱ्याच विचारानंतर सर्वांच्या अनुमते शिवनेरी समोर आलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या ग्रुप मधल्या माझ्या जीवश्च कंठश्च मित्राचं म्हणजेच श्रीधर गोपाळे उर्फ आमचा लाडका "गोपू" ह्याचं घर शिवनेरीच्या जवळच होतं असं त्याचं म्हणणं होतं पण ते किती जवळ होत ते प्रवासानंतरच समोर आलं. पण असो त्या आमिषाने आमचं शिवनेरी आणि त्यासोबत चा NIGHTOUT चा बेत पण सफल झाला. मग आम्ही सगळेच म्हणजे मी उर्मिला, सागर, ऋषी, सुमित आणि गोपू  तयारीला लागलो.


           रविवार सकाळी ७ वाजता  प्रत्येक जण आपापल्या गाड्यांवर स्वार झाले प्रवासाला सुरुवात झाली. मुळातच सकाळी निघायला उशीर झाल्यामुळे लगेचच नाश्ता करायचा ठरवलं म्हणजे नंतर कुठे थांबायची वेळ आली नाही पाहिजे असं म्हणून बदलापूर मुरबाड रोडवरील प्रसिद्ध मुळगाव चा वडापाव खायला मुळगावत आठ वाजता थांबलो. तिकडेच पोटभर नाश्ता करून व गाडीत इंधन भरून आता आम्ही माळशेज च्या मार्गी लागलो.  सुमारे ९.३० च्या सुमारास आम्ही माळशेज घाटात होतो तिथे एक निसर्गरम्य ठिकाणी थांबून फ्रेश झालो व काहीसे फोटो काढले. ऊन वाढायच्या आत निघायचा निर्णय घेतला. बाईक वर Ride करत आम्ही सुमारे 12.30 ला शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलो.
माळशेजमधील विसावा 
              जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. 
         खाली गाड्या लावून आम्ही ६ जण गड चढण्यास सुरुवात केली तसं गड चढण्यासारखं काहीच नाहीये. सर्व ठिकाणी पायऱ्या असल्यामुळे दमछाक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रमत गमत आम्ही १० मिनिटातच महादरवाज्यापाशी पोचलो पुढे गणेश दरवाजा, पिराचा दरवाजा असे एका पाठोपाठ एक तीन दरवाजे लागले.  त्यातून प्रवेश करत आता आम्ही गडावर पोचलो होतो वरून निसर्गाचा आस्वाद घेत घेत प्रवास चालू होता
थोडं पुढे गेल्यावर हत्ती दरवाजा नजरेस पडला तिथे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
 हत्ती दरवाजा 
    पुढे मेणा दरवाजा आणि  कुलूप दरवाजा लागला.  कोणत्याही गडावर प्रवेश करताना इतके दरवाजे लागणारी हि पहिलीच वेळ असेल आमच्यासाठी. हेच दरवाजे शिवनेरीच्या भक्कमतेची साक्ष देतात. सुमारे १ वाजण्याची वेळ असल्याकारणाने वरून सूर्यदेव आमच्यावर जास्तच प्रसन्नता दाखवत होता म्हणून आम्ही आमचा वेग वाढवला आणि पुढे झालो समोर अंबरखाना नजरेस पडला. अंबरखाना म्हणजे तेव्हाच धान्याचं  कोठार. शिवनेरीवरील अंबरखाना म्हणजे "धान्यकोठी" प्रेक्षणीय आहे. अंबरखाण्यावरूनच ह्या अभेद्य  गडाचा अंदाज येतो.
अंबरखाना 
अंबरखान्यातील आतील भाग 
       अंबरखान्यापासून थोडंसं पुढे गेल्यावर उजव्या बाजूस गंगा जमुना टाके दिसतात हि बारमाही पाण्याची टाके असून सध्या पर्यटकांमुळे त्यांची दुरावस्था झाली आहे. इथून थोडं पुढे गेल्यास  डाव्याबाजूस "शिवकुंज" म्हणजेच बालशिवाजी व जिजामाता पुतळा आहे व समोर ज्या पवित्र वास्तूची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे शिवजन्मस्थान हे आता आमच्या डोळ्यासमोर होते. म्हणजेच थोडक्यात गड सर झाला होता.
शिवजन्मभूमी 
      दुमजली असणाऱ्या ह्या वास्तूत तळ  मजल्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती व पाळणा आहे ह्या स्मृतीस आम्ही नतमस्तक होऊन वरच्या मजल्यावर निघालो अरुंद पण पवित्र असणारी हि वाट मनात अभिमान जागवत होती.  रविवार असल्याने गर्दी होती पण वरच्या बाजूस एक सुंदर ग्रुप बसला होता त्यातील "हरीश अंचन" नामक एक व्यक्ती खूप सुंदर बासरी वाजवत होती त्याच्या आवाजाने पावलं आपोआपच त्या दिशेने वळली त्याला एक दोन गाण्याची फार्महीशी केली आजूबाजूचा परिसर वरील खिडकीतून न्याहाळला व आम्ही खाली आलो.

           शिवजन्मस्थानाहून  पूढे जाताना समोरच "बदामी टाके" नजरेस पडले अतिभव्य असलेले हे बारमाही टाके आहे त्याला बदामी टाके हे नाव का आणि कसे पडले देव जाणे???
बदामी टाके 
       पुढे उजव्याबाजूने खाली उतरल्यास जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग दिसतो तो म्हणजे "कडेलोट". महाराजांच्या काळात गुन्हेगारांना इथून खाली टाकले जाई. ह्या जागेची उंची पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. हि वास्तू बघून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो.
कडेलोट 
        एव्हाना २ वाजले होते गप्पा मारत मारत आम्ही कमानी टक्क्यापर्यंत पोचलो. वर कमान व खाली टाके ह्यामुळे ह्या टाकल्यास कमानी टाके म्हणत असावे ह्या टाक्यांमध्ये भरपूर पाणी व गुहेसारखा आकार असल्यामुळे ह्या टाक्यांमध्ये शेकडो वटवाघूळ गडबड करत होती. ती पहिली आणि आम्ही पुढे झालो पुढे कमानदार दारातून उजवीकडे गेलो समोर "शिवाई देवी" चे  मंदिर दृष्टिक्षेपास आलं. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो
शिवाई देवीचे देऊळ 
         उतरताना मनात विचार आला इतकं भव्यदिव्य धान्यकोठार, विपुल पाणीसाठा, इतका बुलंद नि बेलाग किल्ला व जीवाला जीव देणारे सहकारी लाभले तर शिवनेरी केवळ "अजिंक्य" आहे 
धन्य ते शिवराय व धन्य ते मावळे!!!
      शिवजन्मस्थानाला भेट देऊन आमचं जीवन कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.  ह्या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही जवळच असणाऱ्या आमच्या मित्राच्या घरी जावयास निघालो त्याच घर इतकं जवळ होतं कि मला असं वाटलं अजून थोडावेळ गाडी चालवली असती तर आम्ही अफगाणिस्तानात प्रवेश केला असता. इतकी गाडी चालवल्यावर एक वेळ अशी आली की रस्ता संपला धरणासाठी अडवलेल्या पाण्यात पूल हि पाण्याखाली होता तेव्हा आम्ही आमच्या गाड्या बोटीमध्ये चढवल्या आणि तो ओढा ओलांडला. आमच्यासाठी पूर्ण दिवसातलं हेच खऱ्या अर्थाने थ्रिल होतं
बोटीमध्ये गाड्या चढवतानाचा प्रसंग 
       पेमगिरी गावाच्या जवळच असलेल्या "निमगाव पागा" ह्या गावात आम्ही वस्तीस थांबलो पण असो त्याच्यामुळेच आमची राहायची व्यवस्था झाली त्यामुळे गोपू तुझे खूप खूप आभार आणि उर्मिला  तू बनवलेलं जेवण अप्रतिम. सागर ,सुमित तुम्ही सोबत होतात तेच खूप होतं. आणि ऋषी तुझ्याबद्दल काय बोलू मित्रा??? तुझं नाव ऋषी कोणी ठेवलं हाच मोठा प्रश्न आहे.  इतकं थकून सुद्धा सगळ्यांनी दाखवलेल्या उत्साहाला सलाम आहे 
आपले पूर्वज माकडचं होते 
       पुन्हा  दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने सकाळी "पेमगिरी " येथील  कित्येक एकरवर पसरलेल्या वडाच्या झाडास भेट दिली तिथे प्रत्येकाने आपले पूर्वज माकडच होते ह्याचे उत्तम पुरावे देखील दिले. तिथे धमाल मस्ती करून परत गाडीवर बसून सोमवारी संध्याकाळी स्वगृही परतलो. 
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे"