आज मी लिहीत असणारा ब्लॉग हा कोणत्याही गड किल्ल्यांबद्दल नसून ज्या व्यक्तींमुळे माझ्या मध्ये गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली त्यांच्याबद्दल आहे.
वय वर्ष ७० तरीही आज सुद्धा तोच उत्साह, तोच जोश आणि तीतकीच जिज्ञासा असलेले निसर्गात रममाण होणारे इतिहासाचे उत्तम अभ्यासक व भटकंती वरील अगणित पुस्तकांचे लेखक प्रफुल्ल केशवराव घाणेकर सर.
मला आजही आठवतंय मी चौथीत असताना माहुली गड केला होता आणि तिथुनच खऱ्या अर्थाने भ्रमंती ला सुरवात झालेली आणि तेव्हा माझ्या सहकाऱ्यांकडून नेहमी ऐकून होतो की भटकंती करायची तर घाणेकर सरांची पुस्तक वाचून... तेव्हा पासून माझ्या मनात एक प्रकारची जिज्ञासा होती की खरंच आहे तरी काय ह्या पुस्तकात !!!
त्यानंतर मी गड किल्ले सर करण्यासाठी त्यांच्या बऱ्याच पुस्तकांचे मार्गदर्शन घेतले व बरेच गड किल्ले सर किल्ले नंतर बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं "साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची" हे पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक वाचून खऱ्या अर्थाने सह्याद्रीची ओढ निर्माण झाली. त्यांची वाक्यरचना, त्यासोबत घडलेले प्रसंग वाचल्यावर आपल्या मनात देखील उत्सुक्तता निर्माण होते. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात त्यांनी किल्ल्यांबद्दलचा व्यक्त केलेला इतिहास वाचल्यांनंतर त्याच गड किल्ल्यावर जाऊन आपल्याला तोच इतिहास डोळसपणे अनुभवता येतो.
मध्यंतरी एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांच्याशी भेटण्याचा प्रसंग आला पण वेळ खूप कमी होता पण त्याचा मनमोकळा स्वभावाचा अंदाज त्याच २ मिनिटाच्या भेटीत आलेला. मी त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी त्यांचं पुस्तक पुढे केलं तेव्हा बोलता बोलता त्यांनी त्याच पुस्तकावर त्याचा फोन नंबर दिला व मला आजही आठवतं ते म्हणाले की "पुण्यात कधीही आलास तरी फोन कर नक्की भेटूत" त्यादिवशी तर मी सातव्या आसमानात होतो
त्यानंतर लवकरच ट्रेक च्या निमित्ताने पुण्याला जायचा प्रसंग आला तेही सिंहगडाच्या रुपात. २०१७ सालातला पहिला ट्रेक किल्ले सिंहगड... सकाळचं लवकर सिंहगड किल्ला सर केला व उतरताना त्यांना फोन केला तेव्हा सुमारे १२.३० वाजले होते त्यामुळे मला शंका होती की आमची भेट होईल की नाही... पण तो दिवस माझा होता. मी फोन केला त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचा सकारात्मक प्रतिसाद ऐकून माझ्या आनंदाचा पारावर नव्हता
साधारण दुपारी ३ वाजताच्या सुमारास मी त्यांच्या घरी पोहोचलो त्यांचं लिखाण चालू होत खरं तर पुण्यातील माणसे दुपारी झोपतात असं ऐकून होतो पण हा एक अपवाद होता. मी त्यांना आमच्या भेटीचा प्रसंग सांगितला व आमच्या गप्पा चालू झाल्या मला आधी असं वाटलेलं कि आमचं बोलणं हा प्रश्नोत्तराचा खेळ होईल पण बरोबर त्याउलट झालं आमची भेट हे एक चर्चात्मक सत्र झाले ते त्यांचे अनुभव सांगत होते मी माझे अनुभव सांगत होतो. माझ्यासाठी त्यांची भेट हि कोणत्याही देवापेक्षा कमी नव्हती कारण "एकलाव्याने जसं द्रोणाचार्यांची मूर्ती समोर ठेवून धनुर्विद्या शिकलेली तसंच मी त्यांच्या पुस्तकातून च दुर्गभ्रमंती ला सुरुवात केलेली त्यांच्याशी बोलता बोलता बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला म्हणजे हरिश्चंद्रगड हा त्यांनी ९ वाटांनी सर केलेला हे मी ऐकून होतो पण त्या ९ वाटा कोणत्या हे ऐकण्याची मला उत्सुकता होती आणि विशेष म्हणजे हा प्रश्न विचारल्यावर माणूस जितक्या वेळात काही विचार करेल त्यापेक्षा कमी वेळात त्यांनी मला ९ च्या ९ वाटा सांगितल्या व सोबत बऱ्याच साऱ्या ऐतिहासिक गोष्टी सुद्धा कानावर आल्या ज्यांचा खडा न खडा उल्लेख हा त्यांच्या पुस्तकातून वेळोवेळी होत असतो म्हणजे त्यांच्या बोलण्यातून सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा अंदाज येतो
आज माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये येणारा प्रत्येक इतिहासाचा संदर्भ हि त्यांचीच देणं आहे तसेच माझे ब्लॉग वाचून २-४ पाऊलं जरी गड वाटांकडे वळाली तरी त्याचे संपूर्ण श्रेय हे घाणेकर सरांना जातं
त्यादिवशी त्यांच्या भेटीने माझ्या ज्ञानात व माझ्या दुर्गभ्रमंतीच्या प्रवासात बरीच भर पडली शेवट वेळ आलेली निरोपाची पण निघता निघता त्यांनी मला त्यांनीच लिहलेलं किल्ले सिंहगड हे पुस्तक भेट म्हणून दिलं
त्यांनी दिलेली हि भेट हीच मी माझ्या आयुष्याची खरी पुंजी समजतो....
धन्यवाद घाणेकर सर
तुमचं प्रेम आणि आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहो🙏🙏🙏
आपण घाणेकर सरांना ओळखता का ? मला त्यांना भेटण्याची खुप इच्छा आहे...
ReplyDelete