Thursday, 13 July 2017

नाखिंडची खिडकी... (NAKHIND)


            कर्जत कसार्याच्या जवळ राहण्याचा काय फायदा असतो ते निसर्गप्रेमींना विचारा तेच सांगू शकतील. कधीही मनात विचार आला तरी उठून निघू शकतो. कारण बदलापूर सोडलं की आपण थेट निसर्गाच्या सानिध्यातच असतो असंच ह्या रविवारी श्रीधर गोपाळे उर्फ गोपु च्या घरी गेलो दिवसभर काय करायचं ह्यावर थोडावेळ चर्चा झाल्यानंतर गाडी काढा आणि "उठा नि पळत सुटा" म्हणून जवळ च्या जवळ कुठे जायचे ह्या विचाराने मी नखिंड ला जाऊ असा बेत केला. ११.३० च्या सुमारास निघालो १२.३० ला वांगणीत नास्ता केला. थोडफार खायला घेतलं आणि पुढे निघालो. कर्जत रोडवरून वांगणी समोरुन उजव्या हाताला वळलो की आपण थेट बेडीसगावात जाऊन पोहोचतो. बेडीसगाव हे नाखिंडचं पायथ्याचे गाव. खरंतर तिथपर्यंत गाडी जाते म्हणून ते पायथ्याचे गाव नाहीतर खरं म्हणायचं झालं तर वाघिणीची वाडी हेच पायथ्याचे गाव आहे कारण नखिंड वर चढायची सुरवात वाघिणीची वाडीपासूनच होते.
नेढ्यातून दिसणारा चंदेरी
       आम्ही सुमारे १२.३० च्या सुमारास बेडीसगावात होतो. गावातल्या एका घरासमोर गाडी लावली आणि थोडीफार विचारपूस करून गडाच्या वाटेला लागलो. १० मिनिटं चालल्यानंतरच एक ओढा लागला. तो पार करून आम्ही चढाईला सुरवात केली खरं तर आम्ही २ वर्षांपूर्वी जेव्हा आलेलो तेव्हा इतका चांगला रस्ता नव्हता. तेव्हा फक्त पाऊलवाट होती आज तो बऱ्यापैकी रस्ता झाला आहे सुमारे ४५ मिनिटं चालल्यानंतर आम्ही वाघिणीच्या वाडीत पोचलो
          पाऊस नसल्यामुळे आम्ही घामाने डबडबलो होतो. गावात पोहोचताच क्षणी पावसाला सुरवात झाली. तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती पुढे जायची वाट ही पूर्ण जंगलाची वाट होती. रस्ता चुकू होऊ नये म्हणून आम्ही त्या खेळणाऱ्या मुलांमध्येच विचारलं कोणी येणार का वरपर्यंत?? खाऊ ला पैसे देतो. तेव्हा त्यातला एक मुलगा तयार झाला पाऊस सुरूच होता पण त्याच्याकडे पावसासाठी काही नव्हतं मग त्याला म्हंटलं तू हा रेनकोट घे माझ्याकडे आहे दुसरा. तसा तोही खुश झाला.
    त्याच्याशी गप्पा मारत मारत आम्ही वर चढायला सुरुवात केली जाताना त्याला वाटेत त्याचा एक मित्र भेटला. त्याला हा म्हणाला चल हा एकटाच आहे. आधी घेऊन गेलेल्या लोकांना गावात सोडून हासुद्धा आमच्याबरोबर यायला तयार झाला.दोघांची नाव विचारली एकाच नाव प्रदीप आणि दुसऱ्याच नाव देविदास. त्याच्याकडून गावची सगळी माहिती विचारून घेतली. २४ घराचं असलेलं हे छोटेखानी गाव. शाळा म्हंटलं तर १ली ते ५ वी त्यापुढच शिक्षण वांगणीत म्हणजे किमान ७-८ किलोमीटर दूर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही त्या गावात वीज नाहीये तरीही ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता
      वाघिणीची वाडी
          गप्पा मारता मारता आम्ही घनदाट जंगलात प्रवेश करत होतो. वाटेत छोटे मोठे धबधबे ओलांडत आम्ही जवळपास अर्ध्यावर येवून पोचलो. त्याचा वेग आणि माझा वेग ह्याची अजिबात तुलना होऊ शकत नाही कारण ते दोघे जण मला त्यांच्या वेगाने ४० मिनिटांमध्ये नेढ्यापाशी घेऊन गेले . मला आठवतंय मी १.५३ वाजता गावातल्या शाळेत होतो आणि २.४० ला नखिंड वर होतो झालेला ट्रेक हा नॉनस्टॉप च होता कारण त्या दोन हिरोंनी मला कुठेच बसायची संधी दिली. 
        वाटेत लागणारा धबधबा
     घनदाट जंगल
   वाटेत त्या दोघांच्या गप्पा ऐकण्यात वेळ कधी गेला काहीच कळलं नाही मी आपला घरची चौकशी शाळेची विचारपूस करून आणि आजूबाजूचा निसर्ग अनुभवत वर चढत होतो. आणि ती दोघे एकमेकांशी वेगळ्याच भाषेत बोलत होती. तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या भाषेत बोलताय तेव्हा त्यातला एक जण बोलला ठाकरी!!! पण त्या दोघांनी त्यांच्या उत्साहानी माझं मन जिंकलेलं होत. 
दोन वाटाडे
         माझ्याकडे माझा एक मोबाइल होता आणि दुसरा गोपुचा कॅमेरा. बऱ्यापैकी फोटो काढल्यावर त्यांना म्हंटलं घ्या आता तुम्ही पण फोटो काढा असं म्हणून दोन्ही कॅमेरे त्यांच्याकडे दिले आणि मी नेढ्यामध्ये समोरच नयनरम्य दृश्य बघत बसलो हे दोघे जण मस्त एकमेकांचे फोटो काढत होते थोड्यावेळात बॅगेतला नाश्ता काढला. ते दोघे पण बिचारे भुकेलेले होते त्या दोघांनी पण मस्त खायला सुरवात केली. मी नेढ्यातून धुक्याआड लपपलेला चंदेरी दिसायची वाट पाहत होतो. खाऊन झाल्यावर पाणी प्यायची वेळ आल्यावर लक्षात आलं चढता चढता पाणी जवळपास संपल्यातच जमा आहे. नाखिंडवर पाण्याचं टाकं नसल्यामुळे मोठा प्रश्न होता पण आमच्या सोबत असलेल्या दोघांनी नामी शक्कल लढवून पाझरत्या पाण्याची धार शोधून काढली व बाटली पूर्ण भरून घेतली.
       पाझरत्या पाण्याने बाटली भरणारा देविदास
         तोपर्यंत धुक्याआड लपलेला चंदेरी पण नेढ्यामधून दिसण्यास सुरवात झाली होती. नेढ्यातून चांदेरीचे मनसोक्त फोटो काढले आणि ढग बाजूला झाल्यामुळे नखिंडवरून वाघिणीच्या वाडीच सुद्धा अप्रतिम दृश्य नजरेस पडलं ते कॅमेरात टिपलं व परतीच्या प्रवासास सुरवात केली.   
 नाखिंडवरून दिसणारी वाघिणीची वाडी
        एव्हाना त्यांची आणि माझी मस्त मैत्री झाली होती. देविदास हा भन्नाट गाणी म्हणत म्हणत खाली उतरत होता अचानक त्याने एक गाणं गायला सुरवात केली आणि त्यात चक्क मोदींचा उल्लेख आला म्हणून मी त्याला ते गाणं परत म्हणायला सांगितलं आणि त्याचे बोल लिहून घेतले म्हंटलं नंतर download करू अशीच मस्ती करत आम्ही ४.२० च्या सुमारास पुन्हा वाघिणीची वाडीत उतरलो. गावातली मुलं तेव्हा कोंबड्या पकडत होती. ती गावातली मजा बघून कधीतरी खरच अशा गावात रहायला यायची इच्छा झाली. 
    गावातली धमाल
     प्रदीप आणि देविदास ला  त्यांचा मोबदला दिला तेव्हा सकाळची क्रिकेट खेळणारी सगळी मुलं तिकडे हजार होती त्त्यांत्यांना सगळ्यांना निरोप देऊन आम्ही आमच्या घरच्या वाटेला लागलो.
हाच तो निरागस आनंद
      पुन्हा आम्ही दोघे गप्पा मारत मारत खाली उतरायला लागलो ५.३० च्या सुमारास बेडीसगावात पोचून ६.३० ला आम्ही घरी होतो असा हा अर्ध्या दिवसाचा का ना होईना पण फ्रेश करणारा ट्रेक होता
अंधेरी राह मे जलनेवाले दो दीप एक है देविदास दुसरा है प्रदीप.....






Thursday, 6 July 2017

आली लहर, केला सर इर्षाळगड... (IRSHALGAD)


        प्रत्येक वेळी ठरवलेले प्लॅन यशस्वी होतातच असं नाही असेच काहीसं ह्यावेळी माझ्यासोबत झालं पहाटे ४.३० वाजता गोरखगडचा प्लॅन रद्द झाला रविवार असल्यामुळे पहाटे जास्त विचार न करता गप्प झोपलो आरामात ९ वाजता उठलो सगळी कामं वगैरे करून १०.३० वाजले. आता खरा प्रश्न पडला पुढचा पूर्ण दिवस करायचं काय??? रविवारी सुट्टी असून सुद्धा घरी बसायची सवय नसल्यामुळे सुचत नव्हतं. मग शेवट एक दोन मित्रांना विचारलं कुठे जायचे का? काही काही चे पहिल्यापासून प्लॅन असल्यामुळे ते काहीसं शक्य नव्हतं पण मग आपल्या हक्काच्या  एका मित्राला फोन केला तो म्हणजे पप्पू.
(आमच्या दोघांमधील हा संवाद)
मी - काय करतोयस?
पप्पू- काही नाही
मी - चल
पप्पू - कुठे? (खरंतर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नव्हतं पण मागच्या आठवड्यात सोंडाईवरून इर्षाळगड पहिल्यापासून डोळ्यासमोर एकच दृश्य होतं) 
मी - चल पनवेल ला....
पप्पू - पनवेल ला कुठे?
मी - इर्षाळगड!!!
क्षणाचाही विचार न करता मला तो म्हणाला तू तयार हो मी आलोच.
शेवटी काय म्हणतात ना हाकेला धावून येतो तोच खरा मित्र.
       हे सगळं ठरेपर्यंत ११.०० वाजले होते तो पटापट आवरून बदलापूरवरून ट्रेन पकडून ११.५० ला अंबरनाथ ला हजर झाला मी माझी गाडी घेऊन तयारच होतो आम्ही भेटलो आणि आमचा सफर चालू झाला.
                             इर्षाळगड
           इर्षाळगड कडे जायला पनवेल आणि कर्जत दोन्हीकडून वाट आहे म्हणून जाताना पनवेल वरून जायचं ठरवलं google map चा आधार घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो अर्थानं google map ने किती मदत केली हे आमचं आम्हालाच माहीत. रस्ता सांगायचा झालं तर पनवेल कर्जत मार्गावर मोरबे धरणाकडे जायला एक रस्ता डाव्या हाताला जातो तिथून पुढे गेलं की दोन रस्ते लागतात त्यातला उजव्या बाजूचा रस्ता प्रबळगड आणि डाव्या बाजूच्या रास्ता इर्षाळगड कडे जातो तसा दिशादर्शकही आहे वाटेत. त्या वाटेने आम्ही २ वाजता गडाच्या पायथ्याशी गाडी लावली आणि  गड चढण्यास सुरवात केली
                      गडाकडे जाणारे दिशादर्शक 
          पायथ्याचे गाव नमराची वाडी असं होतं खर तर तिथे पोहचेपर्यंत आम्हाला त्या गावचं नाव पण माहीत नव्हतं उतरल्यावर आम्ही विचारलं. गडाच्या पायथ्यापासूनच गडाच्या चढाईला सुरवात होते समोर दिसणारा इर्षाळगड आम्हाला खुणावत होता १५-२० मिनिटं वर चढल्यावर समोर धुक्यात हरवलेला इर्षाळगड आणि मागे मोरबे धरण असं अप्रतिम दृश्य नजरेस पडलं ते कॅमेरात कैद करून पुढे चालत होतो. 
                  गडावरून दिसणारे मोरबे धरण
         थोडंस चाललो असु आणि अचानक पावसाला सुरवात झाली थोडसं भिजलो पण तिकडून थोडं पुढे गेल्यावर अचानक वस्ती दिसायला लागली आम्ही म्हंटलं कुठलं तरी गाव असावं तिकडे विचारल्यावर कळलं की ह्या गावचं नाव "इर्शालवाडी". सुमारे १५-२० घराचं असलेलं गाव. आत्ता ट्रेकचा मौसम असल्याकरण्याने गावाकर्यांनी इर्शाळवाडी मध्ये एक छोटीशी टपरी सुद्धा सुरू केली आहे. तिकडे जेवणाची सोय जरी नाही झाली तरी चहा नाश्त्याची सोय चांगल्याप्रकारे होऊ शकते सकाळपासून पोटात काही नसल्यामुळे आणि मस्त भिजल्यामुळे आधी तिकडे चहा नाश्ता करायचं ठरवलं.

       वाटेवरील चहा नाश्त्याची सोय व मागे धुक्याआडचा इर्षाळगड
           माझ्या सोबत असलेला माझा मित्र बिचारा भुकेने व्याकुळ झालेला खायला भेटल्यावर जरा जीवात जीव आला. आम्ही तिकडे मस्त चहा आणि पोहे खाऊन आल्यावर आम्हाला धुक्यातून बाहेर आलेला इर्षाळगड आणि त्यामधलं नेढ नजरेस पडलं. आता आमच्या चालण्याचा वेग वाढला होता कारण गावात पोहचेपर्यंतच ३ वाजले होते अजून अर्धी चढाई बाकी होती आम्ही पटापट चालवण्यास सुरवात केली आता चढाई अजून कठीण होती


                       गडाकडे जाणारी वाट
           थोडं पुढे गेल्यावर एक देऊळ लागतं त्या देवळाच्या डाव्या बाजूने गेलं की ती वाट थेट इर्शाळगडावर जाते आम्ही चालत होतो पावसामुळे वाट खूप खराब झाली होती. त्याच वाटेने भन्नाट वारा आणि मुसळधार पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा मारा गालावर सहन करत आम्ही गडावर पोहोचलो. गडावर इतकं धुकं होतं की एक क्षण असा होता की आम्ही दोघे जण एकमेकांना पाहू शकत नव्हतो पावसाळा सोडून इतर वेळी गेलं तर इर्शाळगडावरून प्रबळगड चंदेरी, कर्नाळा व माथेरानचे डोंगर सहज नजरेस पडतात

                                                                   इर्षाळगडाच्या वाटेवरील मंदिर
         गडाविषयी माहिती घ्यायची झाली तर इर्षाळगड हा कर्जत आणि माथेरान च्या मध्यभागी वसलेला एक गड आहे. गडाचा विस्तार मोठा नसला तरी गडावरील इर्शालगडाच्या सुळक्यांमुळे हा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. सुळक्यावर जाण्यासाठी rock climbing शिवाय जाता येत नाही त्यामुळे वर पर्यंत नुसतं जाणं अशक्य आहे त्यामुळे इर्शाळगडाचा सुळका आणि नेढ पहिलं. गडावरून दिसणारं निसर्गाचं अद्भुत रूप कॅमेरात कैद केलं खरं तर कितीही फोटो काढले तरी मन भरत नव्हतं पण मग ते दृश्य आठवणींच्या कॅमेरात कैद करून परतीची वाट धरली.
                                                             इर्षाळगडावरील सुळका
       तोपर्यंत ४.४५ झाले होते आणि गडावर फक्त आम्ही दोघेच होतो पण स्वतःची गाडी असल्यामुळे आम्हाला कसलीही भीती नव्हती. आम्ही आरामात गप्पा मारत संध्याकाळी ६.०० वाजता पुन्हा गडाचा पायथा गाठला. गावातील छोट्या मुलांना बॅगेतील खाऊ देऊन आम्ही परत घरच्या वाटेला लागलो. बऱ्याच वेळा नंतर गाडीवर बसल्यावर बरं वाटलं पनवेल च्या ट्रॅफिक पासून वाचण्यासाठी आम्ही येताना कर्जतचा मार्ग धरला ह्या मार्गावर ट्रॅफिक नाही लागलं पण माथेरानच्या पायथ्याशी आम्हाला पावसाने गाठलं पण अंधार झाल्यामुळे कुठेही न थांबण्याचा निर्णय घेतला आणि चिंब भिजून ८.३० ला घर गाठलं.
अशाप्रकारे हा रविवार अर्धा का ना होईना सत्कारणी लागला...
      काही काम नसताना रविवारी घरी बसणं हा खरंच एक गुन्हा आहे......
काही मस्तीभरे फोटो......


धन्यवाद पप्पू माझ्या हाकेला ओ दिल्याबद्दल.....
पुन्हा भेटूत...........


Tuesday, 27 June 2017

निसर्गाची पुण्याई , किल्ले सोंडाई (SONDAI)


       एक रविवार घरी बसून झाल्यावर येणाऱ्या रविवार सोमवारची लागून सुट्टी पाहिली आणि बऱ्याच योजना मनात आल्या अगदी राजगड ठरवलेला पण शेवटी विचार सोंडाई वर येऊन थांबला
       माझं आणि अजय च जवळजवळ बुधवारी ठरलं की सोंडाई ला जायचं शनिवार पर्यंत पावसाचा एक थेंब नव्हता पण शनिवार रात्री अचानक आभाळ फटल्यासारखा पाऊस पडला रात्रभर गडगडाट सुरू होता म्हणून सकाळी उठून सगळ्यात प्रथम TV लावून पाहिलं गाड्यांची काय परिस्थिती आहे. गाड्या उशिराने चालत होत्या पण होत्या ते बघून जरा बरं वाटलं. पटापट सगळी तयारी केली आणि बॅग खांद्याला लावून स्टेशन गाठलं ८.०२ ची कर्जत लोकल पकडून ९. च्या सुमारास कर्जत गाठलं सगळ्यात आधी नाश्ता केला आणि टमटम पकडायला गेलो तेव्हा कळलं की वाटेत एक झाड पडलय त्यामुळे त्यापुढे गाडी जाऊ शकत नाही. बराच वेळ चर्चा केल्यावर एक गोष्टीवर एकमत झालं की जिथपर्यंत गाडी जाऊ शकते तिथपर्यंत जावं पुढचं पुढे बघू माझ्या मते तरी ट्रेकर ने असच असावं तेव्हाच त्याची निर्णयक्षमता ओळखता येते. आम्ही सगळे गाडीत बसलो आणि गप्पा मारत असताना अचानक समोरून बऱ्याच गाड्या यायला सुरुवात झाली तेव्हा आमचा ड्राइवर आम्हाला म्हणाला रस्ता चालू झाला वाटतं. आम्ही एकच जल्लोष केला. तेव्हा ओम शांती ओम चा Dialogue आठवला “अगर किसी  चीज़  को  दिल  से  चाहो  तो  सारी  कायनात  उसे  तुम  से  मिलाने  में  लग  जाती  है"


                 सोंडेवाडीतून दिसणारा सोंडाई

      मग गाडी थेट पायथ्याशी म्हणजे सोंडेवाडी पर्यंत पोहचली सुमारे १०.३० च्या सुमारास आम्ही पायथ्यापासून म्हणजेच सोंडेवाडीपासून प्रवासाला सुरुवात केली. गप्पा मारत मारत आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलो जिथे रस्ता चारी बाजूला जात होता. तेव्हा आम्ही सगळेच विचारात पडलो की नक्की गडाची वाट कोणती तेव्हा तिकडे एक अप्रतिम निशाण दिसलं. दगडांनी बनवलेलं एक बाणाचे निशाण होतं ते पाहून आमचा कोणाचाच मोह आवरला नाही म्हणून आम्ही फोटो काढले आणि तेव्हा आमची दोन मिनिटं अशी चर्चा पण झाली की ज्यांनी हा दिशादर्शक बनवला असेल तो स्वतः नक्कीच चुकला असणार वाट पण त्या व्यक्तीचे खूप खूप आभार ज्याच्या मनात हा पण विचार आला की आपण चुकलो आहोत पण ह्यापुढे कोणी चुकू नये. अशी चर्चा करत च आम्ही पुढची वाटचाल चालू ठेवली.

                               दिशादर्शक
      सुमारे अर्ध्यावर पोहचल्यावर खाली सोंडेवाडी गाव, वर सोंडाई व आजूबाजूला चारी बाजूला हिरवळ. गेले चार महिने उन्हाचे चटके सोसत पहिल्याच पावसात ह्या पर्वत राजाने हिरवा शालू पांघरला होता. हे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद करून आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला दोन शिड्या नजरेस पडल्या तेव्हा आम्हाला कळलं की जवळपास आम्ही पोचलो आहोत शिड्यांवर गर्दी असल्यामुळे आम्ही थोडावेळ तिथेच थांबायचं ठरवलं आजूबाजूला सगळीकडे ढग होते म्हणून आजूबाजूचा परिसर दिसत नव्हता पण थोड्याच वेळात पाऊस थांबून ढगांची हालचाल झाली आणि अचानक लोकमान्य टिळकांच्या टोपीसारखं काहीतरी नजरेस पडलं अजून थोडे ढग बाजूला झाल्यावर समजलं जे दिसत होतं ते दुसरं तिसरं काही नसून तो होता "इर्षाळगड" खरंतर ते पाहून मन भरत नव्हतं दोन दिवस सुट्टी असल्याने एकदा मनात विचार ला सुद्धा की दुसऱ्यादिवशी लागूनच इर्षाळगड केला तर!!! पण मग मनाला आवर घालून आहे त्या क्षणाचा आनंद घ्यायचं ठरवलं.



         सोंडाई वरून दिसणारा "इर्षाळगड"
        १० मिनिटं वेळ घालवून शिडीपर्यंत पोचलो शिडी सुस्थितीत असल्याकारणाने घाबरण्याचं कोणतही कारण नाही ५ मिनिटात शिडी चालून आम्ही गडावर पोचलो शिडी चढल्यावर उजव्या बाजूला बारमाही पाण्याचं टाकं आणि  त्याला लागूनच बाजूला एक गुहा आहे पावसाळा सोडला तर इतर वेळी त्या गुहेचा वापर राहण्यासाठी करता येऊ शकतो

                     बारमाही पाण्याचे टाके
      सुमारे १२.३० च्या सुमारास आम्ही गडावर होतो वरून दिसणारे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होतं सोंडाई च्या उजव्या बाजूस माथेरान, समोर इर्षाळगड, त्यामागे प्रबळगड स्पष्ट दिसतो. किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. माथेरानच्या डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत, पण हा ट्रेक येथील निसर्ग सौंदर्यामूळे अल्हाददायक आहे. गडावर सोंडाई मातेचं देऊळ आहे बंदीस्त नसलं तरी बरेच पाषाण गडावर आजही सुस्थितीत दिसतात
                      गडावरील देवाच्या मूर्ती      

           गडावर पोचलो तेव्हा पाऊस नसल्याकारणाने लगेच जेवायचं ठरवलं प्रत्येकाच्या बॅग हळू हळू रिकाम्या होत होत्या पोटभर अन्नग्रहण केल्यावर सुमारे १.३० च्या सुमारास आम्ही परतीच्या वाटेला लागलो. ३ वाजता गडाच्या पायथ्याशी पोचल्यावर कोणतीही गाडी मिळेपर्यंत चालत जायचं ठरवलं पण नशीबाची साथ असल्याने आम्हाला येताना गावातलीच एक गाडी कर्जत स्टेशनपर्यंत मिळाली ४.१५ ला कर्जत स्टेशनवर पोहोचलो मग चहा वगैरे घेऊन ४.४३ ची गाडी पकडून घरच्या वाटेला लागलो,
असंच एक दिवसात न थकता छोटा पण मस्त ट्रेक झाला
पुन्हा लवकरच भेटूत......


सोंडाई

Sunday, 18 June 2017

खूप कसोट्या पार करून गाठलेला "पारगड" (PARGAD)

      ह्या वेळच्या कोंकण दौऱ्यात मी आणि माझी ट्रेकिंग पार्टनर अश्विनीने कोकणातले ट्रेक किंवा जंगल फिरण्याच ठरवलं होतं त्याप्रमाणे भेकुर्ली नावाच्या गावात गेल्यावर समोर एक गड दिसला तिकडच्या लोकांना विचारल्यावर कळलं की त्या गडाचं नाव "पारगड"

मोरले गावातून दिसणारा पारगड

          मग तिकडे जायची तळमळ चालू झाली इकडून तिकडून माहिती काढून पायथ्याचे गाव वगैरे चौकशी करूननिघायची योजना आखली पण कोणी माहितगार नसल्यामुळे आधी थोडी भीती होती कारण मुंबईतली जंगले आणि कोकणातली ह्यात बराच फरक आहे पण तरीही हिंमत एकवटून दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचा धाडसी निर्णय घेतला.
         सकाळी ७.५० च्या सुमारास घरातून निघालो वाटेत मोराचं सुंदर दर्शन झालं तिकडेच कळलं दिवस भारीच असणार. तसाच प्रवास चालू ठेऊन दोडामार्ग बेडशी मार्गे मोरले ह्या गावात पोचलो गावकऱ्यांशी थोडी चर्चा करून वाटेचा अंदाज घेतला आणि सुमारे ९.१५ च्या सुमारास चालायला सुरुवात केली
मोरले गावातील देऊळ


राष्ट्रीय पक्षी मोर
       गावातल्या मंदिराच्या उजव्या बाजूने जाणारी वाट थेट पारगडावर जाते सुरुवातीला सोपी वाटणारी ही वाट लगेचच ६०-७० अंशाच्या कोनात चढाई ला सुरवात करायला लावते. पाऊस असेल तर चढताना काही वाटणार नाही पण पाऊस नसल्याकारणाने आम्ही जवळपास घामाने भिजलो होतो आत्ता येईल आत्ता येईल म्हणता म्हणता २ तास झाले तरी ना गड दिसत होता ना कोणी माणूस. पूर्ण जंगलात फक्त पक्षांचे आवाज आणि आजूबाजूला फिरणारी फुलपाखरे ह्या सगळ्यांचे फोटो काढत काढत आमची चढाई सुरू होती 



         मध्येच एक छोटीशी नदी लागली मग तिकडेच थोडा वेळ विसावा घ्यायचं ठरवलं थोडेसे फ्रेश झालो आणि परत पुढच्या वाटचाली ला सुरुवात केली. एव्हाना आम्ही आमच्या अंदाजानुसार बऱ्यापैकी वर पोचलो होतो तेव्हा आम्हाला त्या जंगलात एक माणूस दिसला तो लाकडं तोडायला आला होता. आम्हाला बरं वाटलं मग त्यांना आम्ही विचारलं की काका अजून पारगड किती लांब आहे तर त्यांचं उत्तर ऐकून आम्ही हैराण होतो ते म्हणाले "हे काय आलाच की पारगड इथून पुढे थोडी पाऊलवाट आहे, ती चाललात की पुढे एक डांबरी रस्ता लागेल, ती पार केली की मग पायऱ्या लागतील, त्या पायऱ्यांनी तुम्ही गडावर पोहोचाल म्हणजे खरा ट्रेक हा तेव्हाच असतो जेव्हा आपल्याला वाटत असतं आपण पोचलो पण तेव्हा आपल्याला कळतं की अर्ध चढायचं बाकी आहे. 

          तेव्हाच माझ्या मनात विचार आला की,पारगड पर्यंत पोचण्यासाठी मातीचा रस्ता, जंगलवाट, नदी, डांबरी रस्ता इतकं सगळं "पार" करून जावं लागतं कदाचित म्हणून च त्याला "पारगड" म्हणत असावे

      त्या काकांशी गप्पा मारत मारत आम्ही डांबरी रस्त्यापर्यंत पोचलो मग सुमारे अर्धा तास त्या डांबरी रस्त्यावरून चालून आम्ही परगडाच्या पायऱ्यापक्षी पोचलो पारगड हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात येतो म्हणजे तसं पाहायला गेलं तर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला होता हे आम्हाला तिकडे गेल्यावरच कळलं. वाटेवर असणारे ऐतिहासिक फलक वाचत आम्ही गडावर पोचलो वाटेत एक हनुमानाचे मंदिर आहे व त्याच बाजूला त्याकाळच्या काही तोफांचे अवशेष आहेत . 
        हनुमान मंदिर व १६ व्या शतकातील तोफांचे अवशेष
       भरपूर भूक लागल्याने आधी जेवणाची ऑर्डर द्यायचं ठरवलं जेवणाची ऑर्डर दिली आणि पुढे चालत असता डाव्या बाजूला शिवाजी महाराजांची एक अप्रतिम उभी च्या उभी मूर्ती आहे आजपर्यंत महाराजांचे अश्वारूढ पुतळे बरेच पाहिलेले पण ह्या पुतळ्याला तोड नाही तिथेच महाराजांना मुजरा करून पुढे वाटचाल चालू ठेवली. 
     शिवाजी महाराजांचा अप्रतिम पुतळा
     तिथून १०० पाऊले पुढे जाताच पुढे भवानी मातेचं एक भव्य असं मंदिर आहे आणि माझ्या मते ह्या मंदिराची हीच योग्य जागा आहे कारण आजपर्यंत मी देवळात फक्त देवाच्या मुर्त्या पहिल्या आहेत पण हे मी असं पाहिलं देऊळ पाहिलंय जिथे जिजाऊंपासून ते त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांपर्यंत सगळ्यांच्या मुर्त्या आहेत म्हणजे ते पाहून आपण खरच १६ व्या शतकात प्रवेश केल्यासारखं वाटतं.  देवळात दर्शन घेत असताच बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली थोडा वेळ मंदिरात पाऊस कमी व्हायची वाट बघून नंतर आम्ही बाहेर पडलो हवेत मस्त गारवा आला होता 
      भवानी मातेच आकर्षक मंदिर

        तेव्हाच आम्हाला उंचीचा अंदाज आला आता वेळ होती आजूबाजूचा गड फिरायची. चारही बाजूनी गड फिरलो निसर्गाची शांतता अनुभवली गडाबद्दल चे ऐतिहासिक फलक वाचल्यावर कळलं की पारगड, गंधर्वगड, कलनिधींगड, महिपालगड,वल्लभगड, सामानगड असे बरेच गड स्वराज्याच्या रक्षणासाठी उभारले होते 
       पारगड तसा छोटा असल्याकारणाने आजूबाजूचा निसर्ग अनुभवून आम्ही  जेवायच्या ठिकाणी आलो तोपर्यंत सुमारे अडीच वाजले होते आम्ही पोटभर जेऊन सुमारे साडेतीन च्या सुमारास खाली उतरायला सुरुवात केली आणि जी वाट चढायला आम्हाला सकाळी ३ तास लागलेले तीच वाट उतरायला आम्हाला फक्त १ तास लागला. आम्ही बरोबर ४.४५ ला पुन्हा गडाच्या पायथ्याजवळील देवळाकडे होतो खरंतर आम्ही इतक्या लवकर खाली आलो ह्या गोष्टीवर आमचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. खाली येऊन आम्ही एकमेकांना दाखवत होतो की एक तासापूर्वी आपण तिकडे होतो



परगडावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य

पुन्हा कधी ह्या परिसरात फिरायची वेळ आली तर नवीन गडांची माहिती मिळालीच आहे तेव्हा त्यांना नक्की भेट देऊ तो पर्यंत Good bye.....
लवकरच भेटूत........
परतीचा प्रवास

Thursday, 16 February 2017

किल्ले "पेठ"ची ग्रेट भेट..!!!

               फेब्रुवारी महिन्यातला दुसरा रविवार जवळचा कोणताही किल्ला करायच्या उद्देशाने पेठच्या किल्ल्यावर शिक्कामोर्तब झालं. १२ फेब्रुवारी सकाळी मी प्रशांत दादा आणि अनिरुद्ध आम्ही सकाळी ५ वाजता गाडीने जाण्यास सुरवात केली अंबरनाथ ते पेठ हे अंतर सुमारे ५५ किमी आहे लवकर चढायचा उद्देशाने आम्ही लवकर निघायला सुरवात केलेली जोपर्यंत शहरात होतो तोपर्यंत थंडीचा काही अंदाज आला नाही पण बदलापूर सोडल्यावर थंडीचा तडाखा जाणवू लागला अक्षरशः ती थंडी नकोशी वाटावी लागली म्हणून आम्ही जवळपास कुठे चहा ची टपरी दिसल्यास गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला पण सकाळी पाच साडेपाच च्या सुमारास कुठे चहा ची टपरी दिसणंही  मुश्किल झालेलं अखेर नेरळ मध्ये प्रवेश केल्यावर एक हॉटेल मिळालं तिथे २ कटिंग पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली अजूनही २६ किमी अंतर कापायचं बाकी होतं ताशी ४० किमी च्या सावध वेगाने ७.३० च्या सुमारास आम्ही आंबिवली गाठलं. वाटेत पेठ च्या मागून येणाऱ्या सूर्यदेवाचे लोभस दर्शन झाले
               सूर्योदयाचे दर्शन
           रेल्वे ने यायचं झाल्यास प्रथम ट्रेन ने कर्जत गाठावे कर्जतहून एसटी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात यावं. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाचा पायथ्याला पेठ हे गाव आहे. ह्या गावामुळेच ह्या किल्ल्याला "पेठचा  किल्ला" म्हणून संबोधले जाते        गावातून गेलेली ही वाट सरळ किल्लाच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाते. 
             आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास साधारण २ तास लागतात. पेठ गावातून साधारण १ तास. सकाळी  ७.४० च्या वेळी आम्ही चालायला सुरुवात केली सुमारे ३१०० फूट उंचीचा असलेला हा गड मुंबई पुण्याच्या मध्यावर असल्याने सगळ्यांनाच खुणावत असतो  आंबिवली गावातुन १०-१५ मिनीट चालत गेल्यावर डांबरी रस्ता संपतो व लाल मातीची वळणावळणाची वाट चालू होते 

               अम्बिवली गावापासून सुमारे १ तासाची  ही वाट आपल्याला  थेट "पेठ" गावात घेऊन जाते तिथून खरी गडावर चढायला सुरुवात होते डांबरी  रास्ता होण्या अगोदरच हा किल्ला पाहून घ्यावा. गावात एका झाडावर कोथळीगडकडे जाण्यासाठीचा छोटासा दिशादर्शक आहे. ह्या दिशादर्शकाच्या उजव्या बाजूने गडाकडे जाण्याचा रस्ता आहे 
पेठ गांव



         
             ती वाट धरून गप्पा मारत मारत आम्ही वाट कापत होतो .थंडीचे दिवस असल्याने झुडपे जास्त नव्हती पण पावसाळ्यात आल्यास नक्कीच गर्द झाडीचा प्रत्यय येईल. उन्हाचा तडाखा वाढायच्या आत आम्ही चढाई करायचे ठरवले सुमारे एक तास चालल्यावर आम्हाला एक पडझड झालेलं प्रवेशद्वार दिसलं तेव्हा कळलं की आता गडास सुरवात झाली आहे. ह्या दरवाज्याकड़े पाहिल्यावर आपल्याला ह्या दुर्लक्षित किल्ल्याचा अंदाज येतो.
पडझड झालेले प्रवेशद्वार
             ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूची वाट आपल्याला गडाची प्रदक्षिणा घडविते व प्रवेश द्वारातून समोरच दिसतात त्या कातळात खोदून काढलेल्या काही गुहा आणि मंदिर. सर्वात शेवटी आहे ती भैरोबाची प्रशस्त गुहा.या गुहेचे वैशिट्य म्हणजे आतील कोरीवकाम. छताला आधार देणारे खांब व आतील दरवाज्यावर अप्रतिम कोरीव काम केले आहे. हे दृश्य पाहिल्यावर आपल्या नजरेचे पारणे फटते तिथे सुमारे १० मिनिट विश्रांति घेऊन व काही शिल्प कॅमेरात कैद करून आम्ही वर चढण्यास निघालो.





           भैरोबाच्या गुहेतील कोरीवकाम 
           भैरोबाच्या गुहेपासून पुन्हा मंदिरापाशी आल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूस एक गुहा खोदलेली आहे, तिच्यात उजव्या बाजूस  खाली एक पाण्याचं टाकं आहे हे बारमाही टाके आहे.  पुढे ५-१० मिनिट चालल्यावर आपल्याला एक तोफ निदर्शनास पड़ते व डाव्या बाजूस पेठचा किल्ला. इतिहासाची साक्ष  देण्यारी ही एकच तोफ गडावर उपलब्ध आहे

गडावर इतिहासाची साक्ष देणारी एकमेव तोफ            
           भैरोबाच्या गुहेतुन वरच्या बाजूस जाण्यासाठी एक उर्ध्वमूखी भुयार आहे, प्रथमदर्शनी हे लक्षात येत नाही. या भूयारातूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदून काढल्या आहेत. भुयारातून जाणाऱ्या पायऱ्या सुमारे दीड ते दोन फूट इतक्या उंच आणि दमछाक करणाऱ्या असल्या तरी एकंदरीत हा प्रवास रोमांचक आहे. ह्या पायऱ्यांकडे पहिल की आपल्याला त्या  काळातल्या करागिरांच्या कौशल्याचा अंदाज येतो. 
गुहेतुन वर जाण्यासाठी उपलब्ध असणारा एकमेव मार्ग 
          भुयाराच्या मार्गावर शेवटी एक कातळात कोरलेला दरवाजा अन् उजव्या बाजूस शिल्प कोरलेलं आहे. इथून काही पायऱ्या चढून गडावर पोहोचलो. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकं वगळता काही अवशेष शिल्लक नाहीत. परंतु गडमाथ्यावरून चहू बाजूचा डोंगराळ प्रदेश नजरेस पडतो. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील प्रदेश, सिद्धगड, गोरखगड, पदरगड, चंदेरी, प्रबळगड, माथेरान हा दूरपर्यंतचा मुलूख नजरेत येतो परंतु हे सगळं नजरेस पडण्याआगोदर प्रदूषणाचा दाट थर नजरेस पडतो.

 प्रवेशद्वारावरील शिल्प 
              गडाचा इतिहास पाहता सन १६५६-५७ च्या काळात शिवछत्रपतींनी ढाक दुर्ग व राजमाची सोबत कोथलीगड स्वराज्यात दाखल करून घेतला. पुढे नोव्हेंबर १६८४ पर्यंत हा गड स्वराज्यात होता शिवकाळात कोठलीगडाचा संरक्षक ठाणं व शस्त्रागार म्हणून उपयोग होत असे. पुढे छत्रपती संभाजी राज्यांच्या कारकिर्दीत माणकोजी पंढर्यांनी अब्दुल कादरला व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक म्हणून दुर्गत प्रवेश करवून दिला आणि त्याने गडावरच सैन्य कापून काढलं असा ह्या गडाचा रक्तरंजित इतिहास आहे अशा इतिहासाची साक्ष असलेला हा किल्ला पाहून आम्ही आमच्या परतीच्या वाटेला लागलो  
            पेठ गावातुन परतत असताना वाटेत आम्हाला चिंचा बोरं विकणारी शाळकरी मुलं दिसली त्यांच्या डोळ्यात पैसे कमावण्याचा उत्साह आणि आनंद दिसत होेता त्यांच्याकडून बोरं घेऊन आणि काही फोटो काढून आम्ही खाली उतरलो असा हा एका दिवसात करता येणारा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी करावा.... पुन्हा भेटूत नवीन गडकिल्ल्यांसोबत नवीन अनुभवांसोबत...... तोपर्यंत 🙏🙏🙏

गडावरील भैरोबाचे देऊळ